मुंबई: आज विधानसभेत अभिरूप सभागृह घेण्यात आले. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वीर सावरकर यांच्या गौरवाचा ठराव मांडला आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. राज्य विधानसभेतील हा अभूतपूर्व प्रसंग असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेले 25 ते 30 वर्ष मी शिवसेना पाहतो आहे. पण, यापेक्षा लाचार मी शिवसेनेला कधीच पाहिले नाही. कुठे मणिशंकर अय्यर यांच्या छायाचित्राला जोडे मारणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मुख्यमंत्री!
महाराष्ट्राच्या सभागृहात इतका अपमान वीर सावरकरांचा कधीच झाला नाही. पण, आम्ही अभिरूप विधानसभा भरवून त्याच पवित्र सभागृहात गौरवाचा प्रस्ताव मंजूर केला. ज्या पद्धतीचे लिखाण ‘शिदोरी’ मासिकात आहे, ते पाहता काँग्रेसच्या नेत्यांना अंदमानच्या कालकोठडीतच पाठविण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.
आज या अभिरूप विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवपर भाषणेही झाली. वीर सावरकर यांच्याबाबत सांगावे तेवढे कमीच आहे. दोन जन्मठेप, काळ्यापाण्याची शिक्षा, अनन्वित अत्याचार सहन करीत त्यांनी स्वातंत्र्यलक्ष्मीची सेवा केली. जातीप्रथा संपुष्टात आणणे, वंचितांचे उत्थान, मराठी भाषेचा सन्मान जपण्याचे काम त्यांनी केले. महापौर, अर्थसंकल्प हे आज सर्वमान्य प्रचलित शब्द त्यांनीच दिलेले. अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. मनाला अतिशय व्यथा होतात, शिवसेनेचे वर्तन पाहून. पण, भाजपाने आज भारतमातेच्या या वीर सुपुत्राचा गौरव केल्याचे फडणवीस म्हणाले.
बांगड्या घातलेल्या देवीनेचं असुराचा वध केला होता; चाकणकरांनी फडणवीसांना सुनावले