मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे वक्तव्य केले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यानी देखील फडणवीसांना खडे बोल सुनावले.
बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे. पौराणिक कथेमध्ये महिषासुर नावाच्या असुराचा वध बांगड्या घातलेल्या देवीने केला होता, हे फडणवीस विसरले असतील. मात्र, नकारात्मक विचार असणाऱ्या असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही, असे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या वक्तव्यावरून भाजपातील नेते स्त्री-पुरुष समानता समजून घेण्यात कमी पडले असून महिलांना दुय्यम लेखणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, अशी सातत्याने भाजपातील मनुवादी वृत्ती उफाळून येत आहे. असे असले तरी महिलांच्या बाबतीत अर्वाच्च भाषा करणारे फडणवीस सारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, याचा आनंद आहेच. परंतु, सर्वात प्रथम फडणवीसांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांची माफी मागावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली.