Devendra Fadnavis – मराठा आरक्षणाचा (maratha reservation) चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange-Patil) यांनी आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चर्चेसाठी आंदोलनाचे केंद्रस्थान असणाऱ्या आंतरवाली सराटीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. फडणवीस यांनी येथे येऊन आम्हाला आरक्षण देण्यासाठी सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा आहे हे सांगावे, असे ते म्हणालेत.
जरांगे यांनी गत 2 दिवसांपासून फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. पण आता त्यांनीच त्यांना चर्चेला बोलावल्यामुळे विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या म्ुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक झाली.
या बैठकीत सर्वच पक्षांनी मराठा आरक्षणाला अनुकूल अशी भूमिका घेतली. त्यानंतर स्वतः शिंदे यांनी मनोज जरांगेंना आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगेंनी त्यांची विनंती धुडकावून लावत आपले आंदोलन अव्याहत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी पाचारण केले.
जरांगे यावेळी म्हणाले, आम्ही सरकारला गत 4 दिवसांपासून चर्चेचे निमंत्रण देत आहोत. पण ते येत नाही. यामुळे मराठ्यांचा दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला वेळ हवा असेल, तर मला बोलता येते तोपर्यंत चर्चेला या. तुम्हाला किती वेळ हवा आहे ते सांगा.
फडणवीसांनी स्वतः चर्चेला यावे. रस्त्यावर त्यांना कुणीही अडवणार नाही. माझे मराठे त्यांना संरक्षण देतील. सायंकाळपासून मी पाणीही सोडणार आहे. त्यानंतर पाहू मराठ्यांना कसे आरक्षण देत नाही ते, असेही जरांगे यावेळी फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.
..हे नेते हसण्यावर नेतात
आमच्या उपोषणाला 7-8 दिवस झाले. सर्वपक्षीय बैठकीचा तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोरगरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असताना हे नेते हसण्यावर नेत आहेत. त्यांना जनतेचे पालक म्हणायचे का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.