हिंगोली – राज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असून आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये एका 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत त्याने आपले जीवन संपवले.
गोविंद कावळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत म्हटले की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जात आहे. मनोज जरांगे-पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्याकडून तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही या विषयावरून होणाऱ्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.