धाराशिव : सत्तासंघर्षाचा वाद सुरू असतानाच आता राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकार उलथवून राज्यात झालेला सत्ताबदल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी घडवून आणल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो जनतेने कल ही आमच्या बाजुने दिला, माञ उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉउन्सलिंग करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्या.”
पुढे ते म्हणाले, “मला मंत्री पदासाठी डावल्यानंतर धाराशिव जिल्हापरिषदमध्ये मी भाजपसोबत सत्ता स्थापन करून बंड केले. मातोश्रीवर जाऊन हे सरकार बदलल्याशिवाय शांत राहणार नाही. तसेच पुन्हा मातोश्रीचे तोंड ही बघणार नसल्याचे ठरवले.” यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताबदलात माझा काही हात नसल्याचे सांगितले होते. परंतु सावंत यांच्या विधानानंतर आता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संशय निर्माण केला जात आहे.
यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर देखील टिका केली आहे. 2019 साली नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप आणि सेनेला लोकांनी बहुमत दिले, मात्र आमच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जानते राजे या नावाने भारतभर ओळखले जाणाऱ्यांनी टाकला, असे म्हणत तानाजी सावंत यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली.