धिरेंद्र गायकवाड
कात्रज – कात्रज परिसरातील नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपून दिड-दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, प्रशासकीय कार्यकाळातच विकासकामे रेंगाळल्याची वस्तुस्थिती आहे. पालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांकडून तर नको ती महापालिका, अशीच प्रतिक्रिया उमटत आहे.
महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर तातडीने पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. सुरवातीच्या काळात अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा लावीत “प्रशासक’ आल्याची “झलक’ दाखविण्यात आली. परंतु, त्यानंतर अतिक्रमण हटविण्याशिवाय आजपर्यंत कोणतीच ठोस कामे झालेली नाहीत. कात्रज-धनकवडीतील माजी नगरसेवकांनीही यास दुजोरा दिला आहे.
कात्रज-धनकवडीतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या कुठल्याच प्रभागात किरकोळ कामांशिवाय मोठी विकासकामे झालेली नाहीत. तर, नव्याने पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अशा परिसरात अद्यापही प्रशासकांकडून निधी देण्यात आलेला नाही. यामुळे पालिकेत समावेशाबाबत अशा परिसरातील नागरिकांकडून कमालीची नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
नागरिकांची अशीही भावना..
पुणे महापालिकेत समाविष्ट दोन गावे वगळण्यात आल्यानंतर इतर गावांतूनही पालिकेच्या कारभारविषयी नाराजी व्यक्त केली गेली ती अद्यापही कायम आहे. खासदार, आमदारही नुसतेच येऊन जातात. त्यातच सत्तेसाठी वाट्टेल ते, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतरच पालिकेच्या निवडणुका होतील. तोपर्यंत प्रशासकीय काळात समाविष्ट गावांतील मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत, अशीच भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
…यामुळेही कामे दुर्लक्षित
महापलिकेत समाविष्ट झालेला परिसर नेमका कोणाच्या प्रभागात येणार किंवा आहे. याबाबत अद्यापही कोणी काहीच शाश्वती देऊ शकत नाही. महापालिका निवडणूक लांबली तशीच प्रभाग रचनाही एक-दोन वेळा बदलण्यात आली आहे. या कारणामुळेही पालिकेत समाविष्ट भागातील कामे दुर्लक्षित राहिली आहेत. कारण, त्याबाबत कोणी पालिकेकडे पाठपुरावाच केलेला नाही.