पिंपरी – दिवाळीचा सण अगदीच 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळच्या सणासाठी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी बनविण्याची लगबग कारागिरांकडून सुरू आहे. मात्र, केरसुणी बनविण्यासाठी लागणाऱ्या सिंदीच्या वनस्पतीची कमतरता निर्माण झाल्याने केरसुणीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. तसेच केरसुणी बनविणारे कारागीरही आता परराज्यातून कच्चा माल व विक्रीसाठी केरसुणी आणत असल्याने हा व्यवसाय संकटात आला आहे.
जागतिकीकरणामुळे बारा बलुतेदारी पद्धती लोप पावत आहे. विविध आधुनिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. सिंदीच्या पानापासून झाडू व्यवसाय करणारे हळूहळू या व्यवसायापासून काढता पाय घेत आहेत. तर, आधुनिक झाडूने बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे शहरातील कारागिरांची संख्या आता कमी होत आहे. चिंचवड, पिंपरी परिसरात सिंदीच्या पानापासून झाडू बनविण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करणारे आता विक्रीसाठी केरसुणी आणि त्यासाठी लागणारा कच्चा मालही परराज्यातून आणत आहेत.
पूर्वी शहर परिसर आणि उपनगरांमध्ये रावेत, ताथवडे, हिंजवडी, मावळ परिसरात काही प्रमाणात ही झाडे नदीकिनारी होती. कालांतरांना त्यांची सख्या कमी होत आहे. त्यामुळे पाने किंवा तयार झाडूच आता परराज्यातून आणून विकावे लागत आहे. उत्पादन खर्चातील वाढ, झाडूची कमी मागणी झाली आहे, असे कारागिरांनी सांगितले.
आधुनिकतेमुळे व्यवसाय संकटात
आधुनिकतेमुळे पारंपरिक व्यवसाय नष्ट होत असून, यापैकीच एक झाडू व्यवसाय आहे. नवनवीन प्रकारचे झाडू आणि व्हॅक्युम क्लीनर आल्यामुळे हा व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे पूर्वी घराघरांतून आढळणारी आणि “लक्ष्मी’ म्हणून संबोधली जाणारी केरसुणी इतिहासजमा होते की का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आधुनिकीकरणाकडे वळत असताना पारंपरिक व्यवसायही टिकले पाहिजेत. सिंदीची पाने हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्यामुळे पारंपरिक झाडू व्यवसाय डबघाईस आला आहे.
अशी बनविली जाते केरसुणी
दिवाळीत लक्ष्मीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, सोलापूर येथून लक्ष्मी बनवण्यासाठी लागणारी पाने किंवा त्या परिसरातूनच केरसुणी विकत आणली जाते व ती शहरात विकली जात आहे. सिंदीच्या पाना-फडापासून केरसुणी बनवली जाते. तीन महिन्यांपासून याची तयारी केली जाते. एक केरसुणी बनविण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागते. केरसुणी बनविण्यासाठी लागणारी पाने आणून ती उन्हामध्ये वाळविली जातात. त्या पानांना काटे असतात. त्यानंतर त्याचे काटे व इतर कचरा साफ केला जातो. त्यानंतर ती ब्रशने साफ केली जातात. मुठीत बसतील एवढ्या काड्या घेऊन त्याची मुठ वळली जाते व केरसुणी बांधली जाते.