अमृतसर – पंजाबातील शेतकऱ्यांनी मुकेश अंबानी यांच्या जिओवर संताप व्यक्त करीत त्यांच्या टेलिकॉम कंपनीचे आत्ता पर्यंत 1338 टॉवर्स उद्धवस्त केल्याची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांतच या शेतकऱ्यांनी जिओचे 150 हून अधिक टॉवर्स उद्धवस्त केले.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शेतकऱ्यांना असे न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जे कॉमन टॉवर्स आहेत त्यातून अन्य कंपन्यांच्या ग्राहकांनाही त्रास होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पायाभूत सुविधांना हानी न पोहोचवण्याची सुचना केली होती, पण त्यांनी ती मानली नाही. पंजाबातील नागरीकांना जिओचे फोन नंबर सोडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत हजारो लोकांनी जिओचे फोन नंबर सोडून दिले आहेत. आता हे लोक जिओचे टॉवर्सच पाडून टाकण्याच्या कामी लागले आहेत.
मोदी सरकारने अडानी आणि अंबानी या उद्योगपतींना लाभ पोचवण्यासाठीच तीन नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादले आहेत असा शेतकऱ्यांचा पक्का समज असल्याने या उद्योगपतींच्या आस्थापनांना धोका पोचवण्याची कृत्ये घडू लागली आहेत. याचे लोण देशाच्या अन्य भागातही पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने एक नवीच समस्या देशात उद्भवण्याची शक्यता निर्माण होते आहे. टॉवर्सच्या साईट व्यवस्थापकांवर हल्ले करण्याचे आणि त्यांना शिवीगाळ करण्याचेही प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत असे सांगण्यात येते. जेथे कॉमन टॉवर्स आहेत त्या टॉवर्सचा वीज पुरवठाही खंडीत केला जात आहे. या कारणामुळे विस्कळीत झालेली दूरसंचार सेवा पुर्ववत करण्यासाठी संबंधीत कंपन्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. अशा टॉवर्सना पुरेसे पोलिस संरक्षणही दिले जात नाही अशी तक्रार केली जात आहे.