नवी दिल्ली : देशात सध्या अनेक मंत्री, नेत्यांकडून अजब वक्तव्य करण्यात येत आहेत.त्यातही भाजप नेते आघाडीवर आहेत. दरम्यान, आणखी एका भाजपच्या खासदाराने असेच वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. भारतातील सर्व मुस्लीम शिल्पकार हे भगवान विश्वकर्मा यांचे वंशज आहेत, असा दावा भाजपा खासदाराने केला आहे.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रामपुरीमध्ये गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार रामचंद्र जांगडा यांनी हा दावा केला. या गौरव सोहळ्यात बोलताना रामचंद्र जांगडा यांनी भारतातील मुस्लीम शिल्पकारांविषयी भाष्य केले.
“सर्व शिल्पकार भगवान विश्वकर्मांचे वंशज आहेत. फक्त हिंदूच नाही, तर उत्तर प्रदेश मुस्लीम शिल्पकारांनी भरलेला आहे. बाबर त्याच्यासोबत शिल्पकार घेऊन आला नव्हता. तिथे शिल्पकार असूच शकत नाही. इराक आणि इराणमध्ये तिथे गवतसुद्धा उगवत नाही, तिथे शिल्पकला कशी निर्माण होऊ शकते. खनिज तिथे मिळत नाही. तिथे फक्त तेल मिळते आणि तेलामुळे शिल्पकला करता येत नाही”, असे खासदार जांगडा म्हणाले.
#WATCH Every craftsman is descendant of Lord Vishwakarma. Babur didn't come to India with sculptors. There're only sand dunes in Iraq, Iran & UAE so this craft can't exist there. Hence, all Muslim sculptors are descendants of Lord Vishwakarma: BJP RS MP Ram Chander Jangra (01.08) pic.twitter.com/CjjUHHYgJY
— ANI UP (@ANINewsUP) August 1, 2021
“इथे जे मुस्लीम बांधव आहेत, ते सर्वच्या सर्व भगवान विष्णूकर्माचे वंशज आहेत. कुठल्यातरी कारणामुळे त्यांना धर्मांतर करावं लागलं असेल. मी इतिहास वाचला आहे. ही कारणही मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अनेक गोष्टी फक्त सांगण्यासाठी असतात. पण, एक गोष्ट निश्चित आहे की, जिथे श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. मेहनतीला सन्मान मिळत नाही, पुरूषार्थाला सन्मान मिळत नाही. तिथे व्यक्ती धर्मालाच दोष देतो. हे केवळ मुस्लीम शिल्पकारानीच केलं असं नाही, तर हे बाबासाहेब आंबडेकर यांनीही केलं.
मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांना बोलावं लागलं. ते बॅरिस्टर होते. अर्थतज्ज्ञ होते. जो सन्मान त्यांना समाजाकडून मिळायला हवा होता, तो त्यांना मिळाला नाही. हेच मुस्लीम शिल्पकरांसोबत झालं असेल. सन्मान मिळाला नाही म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली”, असे जांगडा यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी विश्वकर्मा समुदायाला एकत्र येऊन राजकीय शक्ती वाढवण्याचंही आवाहन केलं. कामगार आणि श्रमाच्या सन्मानातूनच भारत आत्मनिर्भर बनेल. त्यामुळे विश्वकर्मा समाजाने एकजूट होऊन आपली राजकीय ताकद वाढवावी. देशाच्या विकासात विश्वकर्मा समाजाची मौलाची भूमिका राहिलेली आहे, असंही खासदार जांगडा यावेळी म्हणाले.