नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकच्या निर्णायक लढतीत मी दोन फेऱ्या जिंकल्या होत्या. त्यावेळी मीच विजेती असल्याचा मला विश्वास होता. मात्र, तिसरी फेरी गमावल्यानंतर पंचांनी जेव्हा निकाल जाहीर केला तेव्हा मी हरल्याचे मला समजले.
अत्यंत अनाकलनीय पद्धतीने या सामन्यात पंचगिरी झाली. हा एक प्रकारे माझ्यावर अन्यायच होता, अशा शब्दांत भारताची सहा वेळची जगजेत्ती मुष्टियुद्धपटू सुपरमॉम मेरीकेमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तिने अत्यंत सुमार दर्जाच्या पंचगिरीवर ताशेरे ओढतानाच पदक मिळवता न आल्यामुळे संपूर्ण देशवासीयांची माफी मागितली आहे. मेरीचे रविवारी माययदेशात आगमन झाले तेव्हा तिने माध्यमांशी संवाद साधताना अपली भूमिका विषद केली.
या सामन्यात एकवेळ मी तीनपैकी दोन फेऱ्या जिंकल्या होत्या. त्यामुळे हा सामना मीच जिंकणार, याची मला खात्री होती. मात्र, सामन्याचा निकाल जाहीर झाला व मला पराभूत झाल्याचे जाहीर करण्यात आले तेव्हा मला धक्काच बसला.
दोन फेऱ्या सहज जिंकल्यावर मी कशी काय पराभूत होऊ शकते, हे मला अद्याप समजलेले नाही, असेही मेरीने नमूद केले. पदक न मिळवता मी मायदेशी परतले याचे सर्वांत जास्त दुखः आहे. त्यासाठी मी देशवासीयांची माफीही मागत आहे, असेही ती म्हणाली.