- जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश
पवनानगर – मावळातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पवना व आंद्रा धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पवना धरण प्रकल्पबाधित शेतकऱ्यांपैकी उर्वरित 863 शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणे, पवना बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनातील गोळीबारात जखमी झालेल्या 12 जखमी शेतकऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी देणे, शिरे-शेटेवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणे व पुनर्वसन वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधा पुरविणे या धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतची सविस्तर माहिती घेऊन अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या वेळी आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, स्थानिक शेतकरी प्रतिनिधी रविकांत रसाळ, मुकुंदराज काहूर, बाळासाहेब मोहोळ, बाळासाहेब काळे, शांताराम लष्करी, विलास मालपोटे, रवी ठाकर, पांडुरंग मोढवे, दत्तात्रय ठाकर, सुरेश कालेकर, मारुती दळवी, नारायण बोडके व धरणग्रस्त संयुक्त समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि संबंधित विभागाचे आधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन व इत्तर प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ते मार्गी लावण्यासाठी आमदार सुनील शेळके शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आमदार शेळके यांनी 10 जुलै रोजी पवना धरणाजवळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत आंदोलन देखील केले होते. बुधवारी (दि. 29) मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने धरणग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.