नवी दिल्ली – देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी 52 टक्के सक्रिय बाधित रुग्ण एकट्या केरळ राज्यातील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे गुरुवारी देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून केरळ येथील नव्या बाधितांची संख्या घटत असल्याने थोडा दिलासा असला तरी देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण अद्यापही केरळ येथेच आढळत आहेत, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं.
“केरळ येथे सर्वाधिक सक्रिय बाधित आहेत. ही संख्या देशातील एकूण सक्रिय बाधितांच्या 52 टक्के म्हणजेच 1,44,000 इतकी आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 40,000, तामिळनाडू येथे 17,000, मिझोराम येथे 16,800, कर्नाटकात 12,000 तर आंध्र प्रदेशात 11,000 हुन अधिक सक्रिय बाधित आहेत.” अशी माहिती भूषण यांनी दिली.
देशामध्ये नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येकडे लक्ष वेधताना भूषण यांनी देशातील बरे होण्याचा दर वाढून 98 टक्के झाला असल्याचं सांगितलं.
“सक्रिय बाधितांची संख्या देशभरामध्ये कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढतोय. देशात सध्या करोना रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे.” असं भूषण यांनी सांगितलं.
“रोज करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांमध्ये घट करण्यात आली नसून दररोज 15 ते 16 लाख करोना चाचण्या करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी दर देखील कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी दर 3 टक्क्यांपेक्षा कमी येत असलेला हा सलग 13 वा आठवडा आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी करणे हेच आपले ध्येय असायला हवे. सर्व राज्यसरकारानी हेच ध्येय निश्चित करून काम करायला हवे.” असं देखील भूषण यांनी सांगितलं.
यावेळी आरोग्य सचिवांनी, देशातील 18 जिल्ह्यांमध्ये अद्यापही पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्क्यांदरम्यान असल्याची माहिती दिली.
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांमध्ये 23,529 नवे बाधित आढळून आले आहेत. एकूण सक्रिय बाधितांची संख्या 2,77,020 असून ती गेल्या 195 दिवसांतील सर्वात कमी आहे. सध्याची सक्रिय बाधितांची संख्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.82 टक्के एवढी आहे.