औरंगाबाद – राज्यासह मराठवाड्यात काही दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. या पावसाने विशेषतः मराठवाड्यात मोठी हानी झाली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील या नुकसानीला जलयुक्त शिवारची काम जबाबदार असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे. यातील 90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीला जलयुक्तची कामंच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पर्यावरण तज्ज्ञानांनी काढला आहे. जलयुक्तची कामे करताना नदी, ओढा, नाल्यातून गाळ काढून बाजूलाच टाकला गेला आणि हा गाळ पुन्हा नदी नाल्यात आल्याने सपाटीकरण झाले. त्यानंतर आता अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पाणी पात्र सोडून शेतामध्ये घुसले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे म्हणणे आहे.
पर्यावरण तज्ञाच्या मते अतिवृष्टीनंतर हेच स्पष्टपणे समोर आले आहे की पाणी वाहून जाण्यास जागा न ठेवल्यामुळे नदीचे पात्र बदलले. रस्ते पुलांचे बांधकाम होताना पाण्याचा निचरा करण्याबाबत विचार केला गेला नाही. शिवाय मुख्य पात्राऐवजी चोरट्या मार्गाने वाळू उपसा झाल्यामुळे देखील मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.