अकोले पंचायत समिती गैरव्यवहारात आणखी दोन अधिकारी
नगर – अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या कार्यालयातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झालेली आहे. पहिल्या अहवालात तीन ग्रामसेवक दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
दुसऱ्या अहवालात तीन अधिकारी दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलेला आहे. आज परत यात दोन अधिकारी दोषी आढळले आहे. त्यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अकोले तालुक्यातील पाच ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. या वेळी प्रशासनाने चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकूण तीन पथके नियुक्त केलेले होते.
त्यातील पहिल्या पथकाने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलेला आहे. त्यात तीन ग्रामसेवक दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. दुसऱ्या चौकशी समितीला आपल्या चौकशीमध्ये काही अंशी अपहार स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे तीन अधिकाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेऊन तसा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांना सादर करण्यात येणार आहे.
त्यावर त्यांच्याकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ग्रामसेवकांचे एकतर्फी निलंबन तात्काळ मागे घेण्याची मागणी
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने अकोले तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या कामकाजाबाबत आलेल्या तक्रारींनंतर तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. सदर कारवाई पूर्णपणे एकतर्फी व नैसर्गिक न्यायतत्त्वाला हरताळ फासणारी आहे, असा आक्षेप महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतला आहे.
या प्रकरणातील ग्रामसेवकांचे एकतर्फी निलंबन त्वरित थांबवावे व नैसर्गिक न्याय तत्वानुसार दप्तर तपासणीस वाजवी संधी मिळावी, अशी मागणी युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केली आहे. युनियनच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले व उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घुले यांचा व उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेळके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युनियनचे जिल्हा सचिव अशोक नरसाळे, सुनिल नागरे, राजेंद्र पावसे, शहाजी नरसाळे, मंगेश पुंड, एकनाथ आंधळे , टि.के.जाधव, विजय ढोबरे, श्रीकांत जराड, शिवाजी पालवे, सचिन पवार, नितीन गिरी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी आर.डी.बैरागी, श्री.बोरवे व श्रीमती अरुणा गंभीरे यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक पाहता दप्तर तपासणी झाल्यानंतर त्रुटी पूर्तता अथवा त्यांना लेखी नोटिस देवून, खुलासा घेणे नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरुन होते. परंतु, या प्रकरणात संबंधित ग्रामसेवकांना तशी संधी दिलेली नाही.
त्याचबरोबर राजूर ग्रामपंचायतीच्या तत्कालिन ग्रामसेवकांची चौकशीची मागणी असताना सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाची चौकशी होत आहे. विनातक्रार कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांच्या चौकशा त्वरित थांबविण्यात याव्यात. राजूर ग्रामविकास अधिकाऱ्यास त्यांचय कालखंडामधील व मागील उपलब्ध दप्तर तपासणी कामी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.