लखनौ – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी इंडिया नामक आघाडी स्थापन केली असून आघाडीतील घटक पक्षांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला सहभागी करून घेण्याबाबत समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाने अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी बसपाच्या समावेशाला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे.
असे असताना आता मायावती यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार मसूक नागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीत मायावती यांना जर आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा बनवले गेले नाही तर ती आघाडी अपूर्ण असेल असे नागर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मायावती गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली येथे मुक्कामी आहेत. त्यांनी इंडिया आघाडीत प्रवेश करावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर दबाव वाढत चालला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नागर यांचे विधान पुढे आले आहे. ते म्हणतात की जर भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचे असेल तर मायावती याच पंतप्रधान पदाचा चेहरा असल्या पाहिजे. तसे केले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखणे केवळ अशक्य आहे. ते पुढे म्हणाले की उत्तर प्रदेशात भाजपकडे ४४ टक्क्यांपेक्षाही जास्त मते आहेत. तर इंडिया आघाडीकडे ३७-३८ टक्के मते आहेत.
बहुजन समाज पक्षाकडे आपली स्वत:ची १३ टक्के मते आहेत जी लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. मात्र हे तेंव्हाच शक्य होऊ शकते जेंव्हा मायावतींना पंतप्रधान पदाचा चेहरा केला जाईल. मायावती आज देशातील सगळ्यांत मोठ्या दलित नेत्या आहेत आणि सर्व राज्यांत त्यांना पाठिंबा दिला जातो. मायावतींचा चेहरा पुढे केला गेला तर भाजपडून आकर्षित केला गेलेला दलित मतदार पुन्हा मागे परत येऊ शकतो.