नवी दिल्ली – “वंदे मातरम’ गीताने भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावली होती, त्या गीताला जन गण मन या राष्ट्रगीताचा बरोबरीचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रगीताच्या संदर्भात अशीच सूचना केली होती असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
यातील याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय हे आहेत. ते भाजपचे नेतेही आहेत. त्यांनी म्हटले आहे की, वंदे मातरम गीताचा आदर करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी, जन गण मन आणि वंदे मातरमचा प्रचार-प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या दोन्ही गोष्टी संविधानाने ठरविल्या असल्याने इतर कोणत्याही भावना जागृत होण्याचे कारण नाही.
जन गण मन या गीतातील भावना राज्यांना डोळ्यासमोर ठेवून व्यक्त केल्या गेल्या आहेत. तथापि, वंदे मातरममध्ये व्यक्त झालेल्या भावना राष्ट्राचे चारित्र्य आणि शैली दर्शवतात आणि ते राष्ट्रगीताच्या समान आदरास पात्र आहे असे त्यांचे म्हणणे आहे. वंदे मातरम् हा संपूर्ण देशाचा विचार आणि ब्रीदवाक्य आहे त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून या गीतलाही राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला पाहिजे.