अकोले – म्हाळुंगी ते केळी रुम्हणवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे कामाच्या चौकशीसाठी समिती नेमून दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकाऱ्यांनादिलेल्या निवेदनात केली आहे.
जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने चालू असून, या रस्त्याने होणाऱ्या दळणवळणास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या निकृष्ट कामाबाबत ठेकेदारास सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी अनेकवेळा समज व सूचना दिलेल्या आहेत. तरीही कामामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
कामाच्या संदर्भात माहितीचा फलक लावलेला नाही. असे असतानाही सदर ठेकेदाराने या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचा दाखला संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळविला आहे. याबाबत सदर ठेकेदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे व या कामाच्या बिलाची रक्कम अदा करण्यात येऊ नये. सदर रस्त्याचे कामाचे फेरमूल्यांकन करून पुन्हा या रस्त्याचे काम चांगले करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.