पुणे – मंगळवारी गौरीचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्या, पालेभाज्यांना मागणी वाढली होती. त्यामुळे सर्व फळभाज्यांच्या भावात सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली. तर, पालेभाज्यांचे भाव तेजीत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
बुधवारी (26 ऑगस्ट) गौरी आवाहन आहे. त्यानिमित्ताने गौरीला नैवेद्यासाठी अनेक भाज्या करण्याची प्रथा आहे. परिणामी फळभाज्यासह मेथी, शेपू, कोथिंबिरची मागणी वाढल्याने भाव तेजीत होते. मेथी, शेपू आणि कोथिंबिरीच्या जुडीला किरकोळ बाजारात अनुक्रमे 30 ते 40 रुपये, 20 ते 25 रुपये, 30 ते 40 रुपये भाव मिळाला. पुढील दोन दिवस पालेभाज्यांना चांगली मागणी राहील, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली. पालेभाज्यांबरोबरच घोसावळे आणि आळूच्या पानांना चांगली मागणी राहिली. किरकोळ बाजारात घोसावळ्याचे एका किलोचे भाव 100 ते 120 रुपये राहिले. आळूच्या पानांचा जुडीचा भाव 10 ते 15 रुपये असा राहिल्याचे ढमढेरे यांनी सांगितले.
तर, जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून पालेभाज्यांची आवक होत आहे. मंगळवारी येथील बाजारात कोथिंबिरीची 70 हजार जुडी, मेथीची 50 ते 55 हजार जुडी आणि शेपूची सुमारे 20 हजार जुडी आवक झाल्याचे अमोल घुले यांनी सांगितले. भाज्यांना मागणी वाढली असली तरीही आवक चांगली झाली आहे. तरकारी विभागात 459 वाहनांमधून, तर कांदा, बटाटा विभागात 151 वाहनांमधून शेतमालाची आवक झाल्याचे तरकारी विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी सांगितले.