मुंबई – दिल्ली कॅपिटल्स संघातील करोनाची वाढती प्रकरणे पाहता त्यांचा शुक्रवारी राजस्थान रॉयल्सशी होणारा सामनाही मुंबईतच होणार आहे. हा सामनाही पुण्यात होणार होता. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा बुधवारी पुण्यात होणार सामना मुंबईतच खेळवला गेला होता.
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील दिल्ली व राजस्थान यांच्यातील लढत मुंबईतच हलवली गेली असून त्यामागे खेळाडूंना प्रवास करावा लागू नये हाच हेतू असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
दिल्ली संघाचे फिजिओसह अन्य चार सदस्य करोनाबाधित झाले आहेत. तसेच मिशेल मार्श व टीम सेफर्ट हे दोन खेळाडूही बाधित आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अशा स्थितीत दिल्लीचा संघ मुंबईतच राहणे योग्य ठरेल व त्यांना पुण्यातील तसेच नवी मुंबईतील मैदानांवर सामना खेळण्यासाठी प्रवास करावा लागू नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. सामन्याचे ठिकाण वगळता दिल्ली आणि राजस्थान यांच्या सामन्याबाबत अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.