मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात विविध सामन्यांत अनेकदा पंचांनी चुका केल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयने याबाबत काहीतरी पावले उचलली पाहिजेत, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंचांच्या कामगिरीत सुधारणाच होताना दिसत नसल्याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला आहे.
यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासून मी पाहात आहे की, पंचगिरीचा दर्जा घसरला आहे. करोनाच्या निर्बंधांमुळे आयसीसीच्या पॅनलवर असलेल्या काही अनुभवी पंचांना यंदा आयपीएल स्पर्धेसाठी येता आलेले नाही. त्यांनाही त्यांच्या जीवाची भीती असणार तसेच प्रवासही करण्याचे त्यांच्यावर दडपण येत असेल. म्हणूनच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जास्त संख्येने भारतीय पंचच दिसत आहेत. खऱेतर आयसीसीच्या पॅनेलमध्ये भारतीय पंचांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे या स्पर्धेत पंचगिरी करत असलेल्या पंचांना आयसीसीचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी आहे. पण त्यांच्या कामगिरीत फरक पडताना दिसत नाही. अनेक सामन्यांत चुकीचे निर्णय दिल्याचे सहज दिसत होते, असेही श्रीकांत म्हणाले.
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात अशाच पंचगिरीचा फटका बसला. बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड लखनौचा फलंदाज मार्कस स्टोनिसला गोलंदाजी करत होता. त्याने पहिला चेंडू खूप वाईड टाकल्यानंतरही पंचांनी तो वाईड दिला नाही. पुढचा चेंडूही त्याने त्याच ठिकाणी टाकला. या चेंडूवर स्टोनिसने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो त्रिफळाबाद झाला. चेंडू बॅटला लागून स्टम्पवर गेला व तो बाद झाला. पण व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिल्यावर असे समजले की तो चेंडूही वाईड लाइनच्या खूपच बाहेर पडला होता. हा चेंडू स्टोनिसने फटकावल्यामुळे पंचांनी तो वाईड ठरवला नाही हे मान्य; पण अशा निगेटिव्ह गोलंदाजीवर पंचांनी बंधने आणली पाहिजेत. पंचांचे सामन्यावर नियंत्रण हवे, तेच यंदाच्या स्पर्धेत काही पंचांची कामगिरी पाहताना लक्षात येते, असेही श्रीकांत यांनी सांगितले.
एक निर्णय महागात पडतो
मैदानावरील पंचांच्या कामगिरीवर सामन्याचे भवितव्य अवलंबून असते. त्यांनी दिलेला एक चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. आता मैदानावरील पंचांना तिसऱ्या पंचाची मदत घेता येते. जर ही सुविधा आहे तर मग मैदानावरील पंचांनी ती घेतलीच पाहिजे. एक चुकीचा निर्णय सामन्याचे चित्र बदलू शकतो हे लक्षात घेत पंचगिरी व्हावी, असेही श्रीकांत म्हणाले.