नई दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील हवा अत्यंत खराब झाल्यामुळे प्रशासनाने ग्रॅप-1 टप्पा लागू केला आहे. याचा अर्थ असा की, फटाक्यांवरील बंदीसह 27 कलमी ऍक्शन प्लॅन लागू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील हवा गुरुवारपासून दिवशी अत्यंत खराब स्थितीत पोहचली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार पीएम 10 आणि पीएम 2.5च्या स्तराने 500चा आकडा गाठला आहे. दिल्लीतील हवा मागील आठ दिवसांपासून खराब होत चालली आहे. मात्र, यासाठी दिल्लीची जनता जबाबदार नसून शेजारच्या हरयाणात पराळी जाळली जात असल्यामुळे हवा खराब झाली आहे.
बर्कले अर्थ सायंटिफिक पेपरनुसार, एका सिगरेटमधून 22 मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर प्रदूषण निर्माण होते. दिल्लीतील जनता सध्या 20 सिगरेट ओढावे एवढ्या प्रदुषणात श्वास घेत आहेत. मागील आठ दिवसाची बेरीज केल्यास 153 सिगारेट होईल.
ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऍप्लिड सिस्टम आणि नागपूर येथील नीरी या संशोधन संस्थेने संयुक्तपणे दिल्लीच्या प्रदूषणावर संशोधन केले आहे. यानुसार, पीएम 2.5 प्रदूषणासाठी दिल्लीची जनता 40 टक्के, तर 60 टक्के प्रदुषणासाठी शेजारचे राज्य जबाबदार आहेत.
पंजाब आणि हरियाणा या शेजारच्या राज्यांपेक्षा दिल्लीची हवा अधिक विषारी होत आहे. वायुची गुणवत्ता न सुधारल्यास आगामी काळात परिस्थीती आणखी बिकट होवू शकते, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. अहवालानुसार, दिल्लीच्या वातावरणातील पीएम 2.5 प्रदुषण कणांसाठी वाहने जबाबदार आहेत.
परंतु यात वाहणांची जबाबदारी फक्त 20 टक्के एवढी आहे. उर्वरित प्रदुषण हे हवेतील प्राणघातक कण, शेतीतील कचरा जाळणे, रस्त्यावरील धूळ आणि नगरपालिका कचरा आणि बायोमास जबाबदार आहे. दिल्ली मेडिकल कौन्सिलच्या वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र सैनी यांचे म्हणणे आहे की हवेच्या अत्यधिक प्रदूषणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
हवेतील रासायनिक आणि कण पदार्थांमुळे दमा, उच्च रक्तदाब, रक्तदाब, डोकेदुखी, डोळ्याची जळजळ, त्वचोची अलेर्जीसह अनेक रोगांचा त्रास रूग्णांना होवू शकतो. पीएम 2.5 कण एवढे सूक्ष्म आहेत की ते श्वासोच्छवासाद्वारे रक्तात सहज मिसळू शकतात.
यामुळे बऱ्याच अडचणी उद्भवू शकतात. उच्च प्रदूषणात राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील होतो. डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. तारुन कुमार यांनी वायू प्रदूषणाला साययलेंट किलर म्हटले आहे. प्रदूषण वाढते तेव्हा पीएम -2.5 हृदयासाठी अधिक घातक असते.
दिल्लीत सध्या जो धूर येत आहे तो शेजारच्या राज्यांमधून येत आहे. ते आरोग्यासाठी फार हानिकारक आहे. या धुरामुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साइड आणि मिथेनसारख्या विषारी वायू मिसळतो. यामुळे श्वसन आणि डोळ्याचे आजार होतात.
दिल्लीच्या हवेतील धोकादायक वायूंची पातळी देखील सतत वाढत आहे. हवेतील ओझोनची पातळी मानकांपेक्षा जास्त नोंदविली जात आहे. त्याच वेळी, स्मॉगमुळे, हवेमध्ये कार्बन मोनो ऑक्साईडची पातळी देखील मानकांपेक्षा अधिक आहे.
शिकागो विद्यापीठाच्या संशोधनानुसार, भारताची एक चतुर्थांश जनता ज्या प्रदुषणाचा सामना करीत आहे तेवढ्या प्रदुषणाचा सामना अन्य कोणत्याही देशातील जनता करीत नाही.
अहवालात असेही म्हटले आहे की प्रदूषणाच्या या भयानक परिणामामुळे देशातील बऱ्याच भागातील लोकांचे आयुष्य नऊ वर्षांनी कमी होऊ शकते. प्रदूषण असेच राहिल्यास दिल्लीतील लोकांचे वय 9.7 वर्षांनी कमी होण्याची भीती आहे.
पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) किंवा कण प्रदूषण हे वातावरणात उपस्थित असलेल्या घन कण आणि द्रव थेंबांचे मिश्रण आहे. हवेत उपस्थित कण इतके लहान असतात की त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.
काही कण इतके लहान आहेत की ते केवळ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरुन शोधले जाऊ शकते. कण प्रदूषणात पीएम 2.5 आणि पीएम 10 समाविष्ट आहे जे अत्यंत धोकादायक आहे. पर्टिक्युलेट मॅटर वेगवेगळ्या आकाराचे आहे आणि मानवी आणि नैसर्गिक दोन्ही स्त्रोतांमुळे होऊ शकते.
यामुळे दिल्लीतील जनतेला काही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यात कमीतकमी बाहेर पडणे, बाहेर पडताना एन -95 किंवा पी -100 मास्क वापरणे, जास्त शारीरिक श्रम करणे टाळणे, जॉगिंग करण्याऐवजी हलके चालणे आदींचा समावेश आहे.