बालाघाट -कॉंग्रेसने ब्रिटीश राजवटीविरोधात लढा दिला. इंग्रजांना परत पाठवले आणि भारताच्या स्वातंत्र्याची निश्चिती केली. आम्ही कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घाबरणार नाही, अशी स्पष्टोक्ती कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.
छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि कॉंग्रेसच्या इतर काही नेत्यांविरोधात ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्याचा संदर्भ घेऊन खर्गे यांनी मध्यप्रदेशातील प्रचार सभांमध्ये बोलताना भाजपवर निशाणा साधला. मी छत्तिसगढमध्ये असताना मोदी आणि शहांची फोर्सही तिथेच होती.
ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाच्या छापासत्रातून कॉंग्रेसजनांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. छाप्यांमुळे कॉंग्रेसजनांचे नीतिधैर्य खचेल आणि ते घरी बसतील असे त्यांना वाटते. मात्र, ती इच्छा पूर्ण होणार नाही.
मध्यप्रदेश आणि छत्तिसगढमध्ये कॉंग्रेसच बाजी मारेल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख खोटारड्यांचे सरदार अशा शब्दांत केला.
कॉंग्रेसने काहीच केले नसल्याचे ते म्हणतात. पण, त्यांचे सरकार येण्याआधी कारखाने, शाळा, महाविद्यालयांची उभारणी आम्हीच केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.