वंदना बर्वे
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना राज्यातील ब्राह्मण समुदायाची वाढती नाराजी भाजपला परवडण्यासारखी नाही ही बाब प्रधान यांनी ओळखली आणि हायकमांडला याची लगेच माहिती दिली.
माजी केंद्रीय मंत्री आणि यूपीतील भाजपचे प्रभारी धर्मेद्र प्रधान यांचा ब्राह्मण समुदायासोबत झालेल्या बैठकीचा अहवाल वाचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची झोप उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रधान यांनी अलीकडेच राज्यातील ब्राह्मण खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.
यात ब्राह्मण समुदाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची बाब समोर आली. राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला दुय्यम वागणूक दिली जाते अशी तक्रार सवर्ण खासदारांनी प्रधान यांच्याकडे केली होती.
उत्तर प्रदेश विधानसभेत 56 आमदार हे ब्राह्मण समुदायाचे आहेत. यात भाजपचे 46, सपा आणि बसपाचे प्रत्येकी तीन, कॉंग्रेस आणि अपना दलाचा प्रत्येकी एक आणि दोन अपक्ष ब्राह्मण आमदार आहेत. यावरून सहज लक्षात येते की, लखनौची गादी मिळविण्यासाठी या समाजाचं पाठीशी असणं किती महत्त्वाचं आहे.
ब्राह्मण समाज आपल्या पाठीशी राहावा यासाठी राजकीय पक्षांकडून काय-काय नाही केले जात! बसपा प्रमुख मायावती यांनी “ब्राह्मण संमेलन’च्या माध्यमातूनच लखनौचे तख्त काबीज केले होते, ही बाब कुणापासूनही लपून नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नव्हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अलीकडच्या मंत्रिमंडळ विस्तारात ब्राह्मण समाजाला स्थान दिले होते. मोदी यांनी अजय मिश्रा टेनी यांना केवळ कॅबिनेटमध्ये सामावून घेतलं नाही तर गृहराज्यमंत्री पदासारखं महत्त्वाचं खातंसुद्धा दिलं.
लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिश्रा यांच्या मुलाने अक्षरशः चिरडून टाकले. एसआयटीने या घटनेस पूर्वनियोजित कट-कारस्थान म्हटले आहे. मिश्रा यांचा मुलगा सध्या तुरुंगात आहे. तरी, अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेलं नाही. सवर्ण समाज नाराज होऊ नये हे त्यामागचं कारण असावं.
ब्राह्मण समाजासोबतच्या बैठकांनंतर जी चर्चा पुढे आली आहे ती अशी की, उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांना पक्षात कायम ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून गोरखपूरचे राज्यसभा खासदार शिवप्रताप शुक्ला यांना या समितीचे प्रमुख बनविण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज्यातील सवर्ण समाज हा भाजपसोबत आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेस पक्ष हे भाजप हा कसा ब्राह्मणविरोधी पक्ष आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.
सपाचे प्रवक्ते आणि माजी कॅबिनेट मंत्री आयपी सिंह यांनी ट्विट केले की, “ठाकूर योगीजी यांना आता ब्राह्मण समाजाची आठवण होत आहे. मात्र, मुख्यमंत्री होताच योगीजींनी केवळ गोरखपूर नव्हे तर यूपीतील सर्वात मोठे ब्राह्मण नेते पंडित श्री हरिशंकर तिवारी यांच्या घरावर धाड टाकली. घरावर छापा टाकला, त्यांचा अपमान केला, त्यांची मुलगी खुशी दुबे यांच्या हाताची मेंदी उतरलीदेखील नव्हती. अशात त्यांच्या मुलीला तुरुंगात टाकले’. मुळात योगी आदित्यनाथ यांच्यापुढे तिवारी यांनी गोरखपूरमध्ये तगडे आव्हान उभे केले होते.
अलीकडेच ते बसपा सोडून सपात गेले आहेत. यूपीचं राजकारण नेहमीच जात आणि धर्माच्या अवतीभोवती फिरत असतं. अशात सवर्ण समाज हा लोकांच्या विचारांना प्रभावित करणारा असल्यामुळे राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्यमंत्री योगी हे ठाकूर समाजाचे आहेत. यामुळे हे सरकार ठाकुरांचे आहे, असा समज सवर्णांचा झाला आहे. ही निवडणूक आधीच्या निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हते.
मात्र, यावेळी त्यांच्या नावावर निवडणूक लढवली जात आहे. अशात ठाकुरांचे सरकार आहे, असा विचार करून ब्राह्मण समाज भाजपपासून लांब जाऊ नये, असे भाजपला वाटत आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मण लोकसंख्येच्या 12 टक्के आहेत. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हे ब्राह्मण आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्यातील ब्राह्मणांना सपाशी जोडण्याची जबाबदारी माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार मनोज कुमार पांडे यांच्यावर सोपविली आहे. राज्यातील सवर्ण समाज हा भाजपवर नाराज आहे आणि तो भाजपसोडून जात आहे, हे भाजपचे अपयश आहे, असा त्यांचा दावा आहे.
2007 आणि 2012 मधील मतदानाची आकडेवारी बघितली तर सहज लक्षात येते की, भाजप हा ब्राह्मणांचा नैसर्गिक पक्ष नाही. या दोन्ही निवडणुकांमध्ये सवर्ण समाजाने भाजपला मतदान केले नव्हते. 2022 मध्येही हीच परिस्थिती आहे. ब्राह्मण हा सुशिक्षित समाज आहे आणि उत्तर प्रदेशात बेरोजगारी आणि महागाई खूप वेगाने वाढली आहे याची जाणीव त्यांना होत आहे. ब्राह्मण हे कामाचे मूल्यमापन करून त्यावर मत देतात. त्यामुळे या जोरावर ते सपामध्ये सामील होत आहेत आणि भाजपला त्याची काळजी वाटायला हवी, असा सपाचा दावा आहे.
2007 मध्ये मायावती यांनी ब्राह्मण आणि दलितांच्या सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला शोधून काढला होता आणि बसपाने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. पण “सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’चा नारा देणाऱ्या मायावती यांना 2007 सारखा विजय पुन्हा मिळेल याची शक्यता कमी आहे. पक्षाचा ब्राह्मण चेहरा सतीशचंद्र मिश्रा रॅली काढत आहेत, मायावती प्रचारात मागे पडल्या आहेत? ते का? हे कळायला मार्ग नाही.
दरम्यान, बसपाने आपल्या 300 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. 2007 मध्ये बसपने 86 ब्राह्मणांना तिकीट दिले, त्यात 57 ब्राह्मण निवडणुका जिंकले, बसपने 15 एमएलसी बनवले. अन्य कोणत्याही पक्षाच्या सरकारने ब्राह्मणांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढे आणले नाही. बसपातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते सतीशचंद्र मिश्रा हे ब्राह्मण आहेत.
बसपा “जाती तोडो समाज जोडो’चा पुरस्कार करणारा पक्ष आहे. ब्राह्मणांनी शंख फुंकला आणि हत्ती वाढतच गेला. पण आज सर्वात जास्त छळ ब्राह्मणांचा होतो आहे. राज्यातील 70 टक्के समाजाची हुकूमशाही सुरू आहे व हा समाज मुख्यमंत्र्यांचा आहे, असा आरोप होतो आहे.