लॉकडाऊनचा कालावधी संपायला अद्याप आठवडा शिल्लक असताना सरकारने गल्ली-वस्त्यांमधील छोटी दुकाने सुरू करायला परवानगी दिल्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई आणि पुण्याची अवस्था बिकट असल्याने या शहरांना एवढ्यात तरी दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
गेल्या महिन्याभरापासून सव्वाशे कोटी भारतीय नजरकैदेत असल्यासारखे घरात आहेत. सरकारच्या निर्णयामुळे देशवासीयांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. 3 मे नंतर आपल्याला मोकळा श्वास घेता येईल, असं सर्वांना वाटू लागलं आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, करोना पसरण्याचा वेगसुद्धा मंदावला आहे. देशातील 80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही नवीन रूग्ण सापडलेला नाही.
ही बाब खरी असली तरी, देशाची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई आणि शिक्षणाचं माहेरघर पुणे या तिन्ही शहरांमध्ये करोनाचे रूग्ण वाढतच आहेत. अशात 3 मे नंतर या शहरांना सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीत करोनाचे विषाणू सर्वाधिक तरुणांमध्ये पसरत आहेत. पंरतु, या आजारामुळे मरणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश जास्त आहे.
दिल्लीतील 18 टक्के रुग्ण हे 60 पेक्षा जास्त वयाचे आहेत. मृत्यूची टक्केवारी बघितली तर त्यात 52 टक्के वयोवृद्ध गटातील आहे, असे दिसून आले आहे. 50 ते 59 या वयोगटातील रुग्णांमध्ये मृत्यूची टक्केवारी तीन टक्के आहे तर 50 पेक्षा कमी वयोगटामध्ये हीच टक्केवारी 0.64 एवढी आहे. यामुळे दिल्ली सरकारने ज्येष्ठांची काळजी जास्त घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना घराबाहेर पाठवू नये. एकाकीपण जाणवणार नाही आणि मनासारखे जेवण मिळेल याची पुरेपूर काळजी घेतली जावी, असा सल्ला सरकारने दिला आहे. खरं म्हणजे, एखाद्या माणसाला करोनाची लागण झाली की नाही? हे कोण सांगणार. तर याचं उत्तर आहे टेस्ट.
लॉकडाऊनचा उपाय कमालीचा यशस्वी ठरल्यामुळे भारताचे सर्वत्र कौतुक होत आहे. जगातील विविध देशांकडून भारताच्या उपायांचा अवलंब होऊ लागला आहे. गृह मंत्रालयाने इकडे किरकोळ दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. तिकडे, जगातील काही देशांनीसुद्धा त्यांच्याकडील लहान-लहान दुकानं सुरू करण्यास सुरुवात केली.
इस्रायल सरकारनं रविवारी लहान दुकानं उघडण्याची परवानगी दिली. पण फक्त रस्त्यावरील दुकानं उघडण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा यापुढेही बंद राहतील. रेस्टॉरंटना जेवण पार्सल देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा उघडण्याबाबत विचार सुरू आहे. करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन तृतियांश नागरिकांचा मृत्यू एकट्या युरोपमध्ये झाला आहे. तर एक चतुर्थांश नागरिकांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. तसेच अमेरिकेत करोनाचे एक तृतियांश रुग्ण आढळले आहेत.
अमेरिकेत आतापर्यंत सर्वात जास्त 55 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, अमेरिका करोना विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित देश आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इटली आहे. अख्खं जग करोनाच्या मगरमिठीतून सुटण्याचा प्रयत्न करीत आहे. अशात करोनाच्या मुद्द्यावरून चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने मोर्चबांधणी सुरू केली आहे. अमेरिका यासंदर्भात इतर राष्ट्रांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न करत आहे. चीनच्या वुहानमध्ये करोना विषाणूची उत्पती झाली. या विषाणूची उत्पती कशी झाली? याचे उत्तर चीनने द्यायला हवे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी म्हटले आहे. इतर देशांना एकत्रित करून चीनवर दबाव टाकणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
करोना विषाणूच्या मुद्द्यावर दुसऱ्या राष्ट्रांशी चर्चा सुरू आहे. या विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान शहरात झाली ही बाब अमेरिका अधिकृतपणे अन्य राष्ट्रांना सांगत आहे. या संदर्भात निर्माण होणारी उकल ही चीनने सर्वांसमोर करायला हवी. डिसेंबर 2019 मध्येच चीनमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. चीनमधून देशभरात पसरलेल्या करोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा वाढत असून अर्थकारणावरही याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. जगभरात घोंगावत असलेल्या संकटाला चीन जबाबदार आहे, असा अमेरिकेचा थेट आरोप आहे.
करोना विषाणूमुळे अमेरिकेतीलच नव्हे तर जागतिक अर्थकारण कोलमडले आहे. जागतिक व्यापार पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीनेही योग्य ती पावले उचलली जातील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले. चीनने सुरुवातीच्या काळात करोना विषाणूसंदर्भातील माहिती लपवल्याने जगाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. चीन यासंदर्भातील उपाय योजना करण्यासाठी अकार्यक्षम ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचेही त्यांनी उल्लंघन केले. करोनासंदर्भातील परिस्थिती लपवण्यासाठी त्यांनी बरेच काही केले. यासर्वांचे उत्तरे त्यांना द्यावीच लागतील, असा इशाराच अमेरिकने चीनला दिला आहे.
– वंदना बर्वे