मुंबई – रणजी करंडक तसेच देशांतर्गत क्रिकेटचे सामने जेव्हा होतात त्यावेळी मैदानावर कुठे प्रेक्षक असतात. मग जर आंतरराष्ट्रीय सामना असताना मैदानावर प्रेक्षक नसले तर काय बिघडणार आहे, अशी विचारणा करत रिकाम्या मैदानांवर सामने आयोजित करण्याला भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पंड्या याने समर्थन दिले आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने सर्व क्रीडास्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी जर स्पर्धा खेळविण्याची परिस्थिती आली व करोनाचा धोका पुन्हा वाढू नये यासाठी जर प्रेक्षकांना प्रवेश नाकारुन रिकामी मैदाने ठेवून सामने खेळविले गेले तर त्यात वाईट काय आहे. तसेही आता प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येते त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या घरातच सामने पाहता येतात. तसेही पाहायला गेले तर देशांतर्गत सामन्यांना कुठे प्रेक्षकवर्ग असतो. मग आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्रेक्षक नसतील तर काय बिघडणार आहे, असे मत पंड्याने व्यक्त केले.
आयपीएल स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबतही संभ्रम कायम आहे. अशा वेळी वेळापत्रकातील स्पर्धा आणखी किती काळ लांबणीवर टाकणार. देशात करोनाचा धोका आहे, तसेच लॉकडाऊनही आहे त्यामुळे केवळ क्रिकेटच नाही तर सर्वच क्रीडापटू घरातच बसून आहेत. त्यांनाही आता या सगळ्याचा कंटाला आला असेल.