श्रीनगर : दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जम्मू-काश्मीरात खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 23 वर पोहचली आहे. करोना संकटाचा गैरफायदा घेऊन कारवाया घडवण्याचे नापाक मनसुबे दहशतवादी रचत आहेत. मात्र, सतर्क आणि सज्ज सुरक्षा दलांमुळे त्यांचे डाव उधळले जात आहेत.
ताज्या घडामोडीत दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या सुरक्षा जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये 3 दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. चालू वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरात 50 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे.