– वंदना बर्वे
18व्या लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. मात्र, यात अग्रभागी आहे तो ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष. भाजप आणि काँग्रेसनेही महिलांना तिकीट दिलं आहे.
येत्या शुक्रवारी अर्थात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी मतदान केले जाणार आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील या जागांसाठी 1625 उमेदवार रिंगणात आहेत. यात 1491 पुरूष आणि 134 महिला आहेत. अर्थात महिला उमेदवारांची टक्केवारी केवळ 8 आहे.
पहिल्या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जाणार्या राज्यांमध्ये छत्तीसगड (11), जम्मू-कश्मीर (12), लक्षद्वीप (4), मणिपूर (10), नागालँड (3) आणि त्रिपुरा (9) ही अशी सहा राज्ये आहेत ज्या ठिकाणी एकही महिला उमेदवार नाही. कंसात दिलेली संख्या ही एकूण उमेदवारांची आहे आणि हे सर्व पुरूष उमेदवार आहेत.
अन्य राज्यांतील एकूण उमेदवार आणि त्यातील महिला उमेदवारांबाबत सांगायचं झालं तर मध्यप्रदेशात (88-7), महाराष्ट्रात (97-7), मेघालय (10-2), मिझोराम (6-1), पुद्दुचेरी (26-3), राजस्थान (114-12), सिक्कीम (14-1), उत्तरप्रदेश (80-7), उत्तराखंड (55-4) आणि पश्चिम बंगाल (37-4) आहेत. अंदमान आणि निकोबार (12-2), अरुणाचल प्रदेश (14-1), आसाम (35-4) आणि बिहार (38-3) उमेदवार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 1957 मध्ये एकूण 45 महिलांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये ही संख्या 726 वर पोहचली होती. याच काळात पुरुष उमेदवारांची संख्या 1474 वरून 7,322 वर पोहोचली आहे. 2019 मधील निवडणुकीत 9 टक्के उमेदवार महिला होत्या. 1957 मध्ये ही संख्या 2.9 टक्के होती. काळानुसार महिला उमेदवारांची संख्या वाढत गेली असली तरी आजपर्यंत महिला उमेदवारांच्या संख्येने एक हजाराचा आकडा गाठला नाही, ही एक मोठी शोकांतिका होय.
957 मध्ये 45 पैकी 22 महिला विजयी झाल्या होत्या. यास टक्केवारीमध्ये बघायचं झालं तर 48.88 एवढी होती. 2019 मध्ये मात्र ही टक्केवारी 10.74 वर खाली उतरली. गेल्या निवडणुकीत 726 महिला उमेदवारांपैकी केवळ 78 उमेदवारांना विजय मिळवता आला होता.
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत कंगना राणावत आणि हेमा मालिनी यांना तिकीट दिलं आहे. दोघीही अभिनेत्री आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बहुतांश महिला उमेदवार या चित्रपट दुनियेशी संबधित आहेत.
याशिवाय राजकीय पक्षांनी ज्या महिलांना उमेदवारी दिली आहे त्या एक तर मोठ्या नेत्याच्या कुटुंबातील आहेत किंवा बाहुबली कुटुंबातील आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजघराण्यातील महिलाही आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा निवडणुकीत सहभाग अजूनही खूपच कमी आहे.
महिला प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवित आहेत. यास राजकारणही अपवाद नाही. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीतही अनेक महिला अशा आहेत ज्यांना आता कोणत्याही परिचयाची गरज उरलेली नाही. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी दोन टर्मपासून कन्नौजचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, यावेळेस त्या मैनपुरीमधून रिंगणात उतरल्या आहेत. तशा त्या फार कमी बोलतात.
परंतु, मुद्दा महिलांशी संबंधित असेल तर त्या आपले मत मांडायला मागे-पुढे बघत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक संसदेत आणले तेव्हा त्यांनी त्याचे समर्थन केले होते. सोबतच एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक महिलांनाही आरक्षण असायला पाहिजे, अशी मागणी रेटून लावली होती. अलीकडेच त्यांनी भाजप सरकारमध्ये महिलांना न्याय मिळत नसल्याचा मुद्दा उचलला होता.
17 व्या लोकसभेतील सर्वाधिक आक्रमक चेहरा कोणता? असा प्रश्न कुणी विचारला तर महुआ मोईत्रा हेच नाव घ्यावं लागेल. ममतादीदींनी महुआ मोईत्रा यांना पुन्हा एकदा बंगालच्या कृष्णानगरमधून मैदानात उतरविले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. देशाच्या संसदेत आपला आवाज बनवून जनता मला नक्कीच लोकसभेत पाठवतील, असे त्यांना वाटत आहे. भाजप नारी शक्ती वंदनाची चर्चा करते; पण लोकसभा निवडणुकीत नारी शक्ती वंदनाचे काय झाले? महिलांना कमी जागा का दिल्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पश्चिम बंगालमधील हुगळी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार लॉकेट चॅटर्जी हाही एक चर्चित चेहरा होय. भाजपचे खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीने जेव्हा महुआ मोईत्रा यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. तेव्हा लॉकेट चॅटर्जी प्रकाशझोतात आल्या. त्या या समितीच्या सदस्या होत्या. पश्चिम बंगालमधील भाजपचा सशक्त महिला चेहरा असलेल्या लॉकेट चॅटर्जी यांच्या मते, देशाला विकसित राष्ट्र बनवण्यात महिला शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. स्त्री शक्तीशिवाय संपूर्ण विकास शक्य नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महिला शक्ती वेगाने प्रगती करत आहे. महिला शक्तीचा सर्वत्र प्रचार करण्यात आला आहे. एक स्त्री घराची देखरेख करते आणि बाहेरची कामेही उत्तम प्रकारे हाताळते.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक चर्चित चेहरा म्हणजे महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी. त्यांनाही भाजपाने निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. लोकसभेच्या या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे हेमा मालिनी. भाजपने त्यांना मथुरेतून तिसर्यांदा तिकीट दिले आहे. त्या स्वतःला आता श्रीकृष्णाची गोपी समजतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ‘मथुरेतील कृष्णलीलामध्ये जेव्हा मी सहभागी होते तेव्हा मला माझ्यात एक दैवी परिवर्तन झाल्याचे दिसून येते आणि मी स्वतःला देवाची गोपी समजते.’ मुंबईचे ग्लॅमर सोडून त्यांनी आता मथुरेला आपलं ठिकाण बनविलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीहून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेतल्याशिवाय देशातील तेजतर्रार महिला खासदारांची यादी पूर्णच होऊ शकत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या त्या कन्या असल्या, तरी त्यांनी स्वबळावर देशाच्या राजकारणात एक मानाचं स्थान निर्माण केले आहे. लोकसभेत जेव्हा त्या बोलतात तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या तोंडचे पाणी पळाल्याशिवाय राहात नाही. काँग्रेसच्या खासदार रंजिता रंजन, राम्या हरिदास यांनीसुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध केलं आहे. सध्या काँग्रेसने या निवडणुकीत महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं आहे. यामुळे 18व्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या आपल्याला केवळ वाढलेली दिसणार नाही, तर भविष्यात महिलांना नवी दिशा देणारे चेहरे बघायला मिळतील.