– वृषाली पंढरी
प्रसिद्ध उर्दू कवी अमीर खुसरो भारतातील गझल प्रकाराचा जनक समजला जातो, तर सुरेश भटांना ‘मराठी गझल सम्राट’ म्हटले जाते. आज त्यांच्या जयंती निमित्त विशेष लेख…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुरेश भटांची एवढी श्रद्धा होती की आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. कालच आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी केली. आज सुरेश भटांची 92वी जयंती आहे. सुरेश भटांनी खडतर आयुष्य जगले पण मात करून आयुष्यात यशस्वीही झाले.
अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथांचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडसर होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर-शांताला लग्नानंतर 15 एप्रिल 1932 रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीच वर्षाचा असताना पोलिओमुळे त्याचा उजवा पाय अधू झाला. वडील श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही त्याकाळी पोलिओवर रामबाण औषध किंवा लस उपलब्ध नसल्याचे काही करू शकले नाहीत.
अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकले नाही. अभासातही यथा तथाच असल्याने शिक्षण संपता संपता मॅट्रिकला डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मात्र दुसर्यांदा मॅट्रिकला बसून पास झाले, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाले, तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्यांदा परीक्षेला बसून तिसर्या श्रेणीत पास झाल्यावर पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही टिकली नाही. पण एक गोष्ट मात्र सुरेश यांच्याकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. तिनेच पुढे सुरेश यांना नावारूपाला आणले.
समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेवून कंदिलाच्या प्रकाशात सुरेश कविता लिहीत असत. असेच एकदा अमरावतीला सुरेश यांना प्रसिद्ध कवी आणि लेखक स्टेशनवर भेटले व उपहासाने सुरेश यांना म्हणाले, ‘कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर.’ पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने तेव्हा म्हणाले, ‘ते अजून ठरायचंय!’ सुरेश यांनी आईकडून कवितेप्रमाणेच संगीताची आवडपण उचलली होती. डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्यांची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी संगीत शिकवणी सुरू केली आणि सुरेश यांनी त्याचे चीज केले. शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश यांनी सुरू केलेल्या जोर दंडबैठका यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने ते सायकलही चालवू लागले. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेश यांनी काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन्तास बसण्यासाठी झाला. त्यांनी तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.
1961 साली सुरेश यांचा वयाच्या 29 व्या वर्षी नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला ‘रूपगंधा’. त्यास दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक मिळाले कुसुमाग्रजांना. या यशानंतर हिणवणारे समकालीन सुरेश यांना ओळख देऊ लागले. यानंतर 13 वर्षांनंतर सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, ज्याला प्रतिष्ठेचे केशवसुत पारितोषिक मिळाले. या पुस्तकाला एवढे महत्त्व आले की बीएला दोनदा नापास झालेले सुरेश यांचा ‘रंग माझा वेगळा’नंतर 3 विद्यापीठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवले गेले. 1983 साली सुरेश यांनी स्वत:च प्रकाशक होत ‘एल्गार’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.
त्यांचे नशीब चांगले म्हणून पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेश यांचा काव्यसंग्रह एका पदपथावरील दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित झालेल्या हृदयनाथांनी सुरेश यांना शोधून काढले आणि त्यांच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केले. ‘मालवून टाक दीप’ ते ‘केव्हातरी पहाटे’पर्यंत अशा या तळपत्या सूर्याचा-सुरेशचा कवीवर्य सुरेश भट बनवले. नंतर सुरेश भटांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपली कला त्यांनी गझल लेखनाकडे वळवली. सुरेश भटांनी लिहिलेल्या पाचशेपेक्षा अधिक कवितांमध्ये 260 हून अधिक अर्थपूर्ण गझल आहेत ज्यांनी त्यांना गझल सम्राट बनवले. त्यांच्या गाजलेल्या काही गझला-
1) तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
2) मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग
3) आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
4) सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे
अजून ही वाटते मला की, अजून ही चांद रात आहे
5) मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
6) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले!
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले!
स्वतःच्या जीवनावर लिहिलेली गझल-
7) रंगुनी रंगांत सार्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?
सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा’
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!