नवी दिल्ली – बुरारी येथे झालेल्या हिंदू महापंचायतमध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवले आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पहिला एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि सेव्ह इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक प्रीत सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी झालेल्या बाचाबाचीप्रकरणी पोलिसांनी दुसरा एफआयआर नोंदवला आहे. तिसरा एफआयआर सोशल मीडियावर खोटी माहिती (द्वेषपूर्ण भाषण) पसरवण्याचा आहे.
काय आहे प्रकरण ?
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या दसना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. जर देशाचा पंतप्रधान मुस्लिम झाला तर 20 वर्षात देशातील 50 टक्के हिंदू धर्मांतर करतील, असे त्यांनी म्हटले आहे. बुरारी मैदानावर आयोजित हिंदू महापंचायतीत ते बोलत होते. या कार्यक्रमाला दिल्ली प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. सेव्ह इंडिया फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेशी संबंधित सुरेंद्र गुप्ता, सुदर्शन टीव्हीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाण उपस्थित होते. यात अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वक्ते म्हणून हिरालाल पांडे, धरमपाल गोयल, पिंकी चौधरी, सत्य नारायण गर्ग, देवेंद्र सिंग उपस्थित होते.
याआधी हरिद्वार आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे हिंदू महापंचायतीचे आयोजनही करण्यात आले होते, ज्यामध्ये समुदायविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. रविवारी बुरारी येथे आयोजित कार्यक्रमाच्या आयोजकांनी नरसिंहानंद यांच्या वादग्रस्त विधानापासून स्वतःला दूर केले आहे.
महापंचायतच्या आयोजकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कार्यक्रमात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेले नाही. तर एका हिंदू महापंचायतीच्या सोशल मीडियावर कथितपणे व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार नरसिंहानंद 2029, 2034 किंवा 2039 मध्ये एक मुस्लिम देशाचा पंतप्रधान होईल, असे म्हणताना ऐकू येत आहे. मुस्लिम व्यक्ती पंतप्रधान झाला की 50 टक्के हिंदू धर्मांतरित होतील, 40 टक्के मरतील आणि उर्वरित 10 टक्के निर्वासित छावण्यांमध्ये राहतील किंवा देश सोडून जातील, असे म्हंटल्याचे ऐकू येत असल्याची माहिती आहे.
पत्रकारांनाही मारहाण –
दरम्यान, बुरारी येथे आयोजित कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी दिल्लीतील काही पत्रकार गेले होते, तिथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. कार्यक्रमाला पोहोचलेल्या काही पत्रकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.