नवी दिल्ली : करोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील असे टेड्रोस एडहानोम याचे म्हणणे आहे. जिनिवामधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. काही ठिकाणी करोनाचा फैलाव वाढत असल्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका निर्माण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“लॉकडाऊन हटवावे अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील,” असे टेड्रोस एडहानोम यांनी म्हटले आहे. युरोपात करोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाउनचे निर्बंध शिथील करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.