देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूतील गट नं.97 या गायरान क्षेत्रातील जमीन देहूच्या विविध प्रकल्प व विकासासाठी तसेच भाविकांच्या सोयी- सुविधांसाठी उपयोगात येणार असल्याने ते कोणालाही देऊ नये.त्याचा बचाव करण्यासाठी शुक्रवारी (दि.13) दिंडी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी संजय अस्वले व अप्पर तहसीलदार डॉ.अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले. परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांसह सर्वानीच कडकडीत बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शविला होता. तर कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान, नगरसेवक – नगरसेविका, देहूकर ग्रामस्थ, वारकरी, सेवेकरी यांनी महाद्वार चौक मुख्य मंदिरापासून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टाळ वाजवीत दिंडी मोर्चा काढला. 14 टाळकरी कमानमार्गे दिंडी मोर्चा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, नगरसेवक योगेश परंडवाल, शैलेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
उपजिल्हाधिकारी संजय असवले, हवेली अप्पर तहसीलदार डॉ.अर्चना निकम यांना निवेदन स्वीकारत आपले म्हणणे वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार निकम यांनी यावेळी दिले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव, ग्रामतलाठी सूर्यकांत काळे नगरसेवक, नगरसेविका, संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष -विश्वस्त,राजकीय, सामाजिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देहूकर ग्रामस्थ आधी दिंडी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
देहूकर आंदोलनाच्या पावित्र्यात
तीर्थक्षेत्र देहूत भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गावची पूर्वी 10 हजार असणारी लोकसंख्या वाढून 70 हजारांवर पोहोचली आहे. मात्र भूभागही मर्यादितच आहे. वाढती लोकसंख्या आणि भाविकांसह ग्रामस्थांच्या विविध सोयी सुविधा, विविध प्रकल्प व योजनांसाठी देहूतील गायरान जमीन उपयोगात येणार असून ती ही कमी पडणार आहे.त्यामुळे गायरान जागा कोणालाही देऊ नये. गायरानाबाबतचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी देहू नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे;अन्यथा तीव्र आंदोलनाचा पावित्रा घेतला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.