नवी दिल्ली – देशातील विविध प्रवाह लक्षात घेऊन, आपण आपल्या निर्णय प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही प्रक्रियेवर टीका करणे खूप सोपे आहे. परंतु मी अनेक वर्षांपासून या प्रक्रियेचा भाग असून न्यायाधीशांच्या नियुक्तीपूर्वी सल्लामसलत करण्याची योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधीश सर्व प्रयत्न करत आहेत, असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करणार्या न्यायमूर्तींच्या कॉलेजियम प्रणालीचा बचाव केला. तसेच विविध विषयांवर आपले मत मांडले.
डीवाय चंद्रचूड म्हणाले, कॉलेजियम प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या प्रणालीत अधिक पारदर्शकता राखली जावी यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. या निर्णय प्रक्रियेत वस्तुनिष्ठतेची भावना राखली गेली आहे. पण कॉलेजियममध्ये होणारी चर्चा विविध कारणांमुळे सार्वजनिक क्षेत्रात मांडता येत नाही. आमच्या अनेक चर्चा सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी विचाराधीन असलेल्या न्यायाधीशांच्या गोपनीयतेवर आहेत, असे त्यांनी सांगितले.
अयोध्येचा निर्णय एकमताने
अयोध्या प्रकरणाचा निर्णय न्यायाधीशांनी एकमताने घेतला आहे. अयोध्येतील संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि विविध पैलू लक्षात घेऊन या खटल्याशी संबंधित सर्व न्यायाधीशांनी निर्णयावर एकमत केले. आम्ही संविधान आणि कायद्यानुसार निर्णय घेतो. टीकेला प्रत्युत्तर देणे किंवा माझ्या निर्णयाचा बचाव करणे मला योग्य वाटत नाही. तसेच समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्यास नकार देणाऱ्या निर्णयाच्या गुणवत्तेवर भाष्य करणार नसल्याचेही ते म्हणाले.