पाटणा – विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जेव्हा सत्तेवर येईल तेव्हाच प्रभु रामचंद्रांना त्यांचे खरे घर मिळू शकेल असे प्रतिपादन राजदचे नेते आणि बिहारचे एक मंत्री तेजप्रताप यादव यांनी केले आहे. त्यांनी रामाचे राजकीय भांडवल केल्याबद्दल भाजपवर कठोर टीका केली आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी असा दावा केला की आगामी लोकसभा निवडणुकीत जेव्हा इंडिया आघाडी जिंकेल तेव्हाच भगवान राम घरी येतील.दरम्यान त्यांच्या या दाव्यावर बिहार मधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले की सगळी इंडिया आघाडीच हिंदु विरोधी आहे.
या आघाडीचे लोक सनातनवर सतत हल्ले करत आहेत आणि हिंदू धर्माचा अपमान करत आहेत. ते ख्रिश्चन किंवा इस्लामबद्दल काहीही बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्यांच्या मनात जे येईल ते ते बोलतात. आज देशातील करोडो लोक राम मंदिरात जाण्याच्या तयारीत असताना त्या मंदिराला गुलामगिरीचे प्रतीक म्हणणे चुकीचे आहे, असा दावाही सुशिलकुमार मोदी यांनी केला.