नागपूर – जगभरातील अमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष चमूच पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्र पोलीस दल मजबूत आहे, गुन्हेगारांना येथे दयामाया दाखवली जात नाही तर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवले जाते. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक व्हायलाच हवे, असेही त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आवर्जून सांगितले.
नागपूर येथे जलदगती डीएनए तपासणी व वन्यजीव तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होऊन महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. महाराष्ट्रात अमली पदार्थवरून तापलेल्या वातावरणावरही त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले.
अमली पदार्थाला सध्या मोठे पेव फुटले आहे आणि त्यावरून महाराष्ट्राला लक्ष्य केले जात आहे.मात्र , महाराष्ट्र हे बोलघेवड्यांचे राज्य नाही. महाराष्ट्रात जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते.असे म्हणत अंमली पदार्थांच्या धाडीवरून विशेष चमूचे विशेष कौतुक होत आहे. कारण त्यात ‘हिरो’ होते मात्र, चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी २५ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले, पण त्यात ‘हिरोईन’नव्हती. त्यामुळे एवढ्या मोठ्या कामगिरीची कुठे दखलही घेतली गेली नाही.