– अमरजीत विलासराव कुलकर्णी
सकाळचा अलार्म जोरात वाजत होता, कसाबसा पांघरुणामधून हात बाहेर काढून त्याचा आवाज बंद करून परत एखादी डुलकी घ्यावी म्हणून कूस बदलून परत मी झोपी गेलो. पण अचानक आमच्या दुसऱ्या अलार्मने किचनमधून मला आवाज दिला, “”अहो, उठा साडेआठ वाजले आहेत. ऑफिसला जायला उशीर होईल, ट्राफिक वाढेल… उठलात का?” या अलार्मला मी बंद करू शकलो नाही आणि इच्छा होत नसताना देखील कसाबसा “अगं काय सकाळी सकाळी ओरडत आहेस?’ अशी बडबड करत उठलो आणि डोळे चोळत सहज घड्याळाकडे पहिले तर आठ वाजले होते. मी तिच्याकडे पाहात बोललो, “अगं काय खोटे बोलतेस! आता कुठे आठ वाजले. कशाला उठवलेस उगीच?’ पण नाईलाजाने मला उठावे लागले.
अंथरुण पांघरून घडी करत मी तिला विचारले, “आज ऑफिसमधून यायला कदाचित उशीर होईल, पण जर लवकर आलोच तर आज आपण पिक्चर बघायला जाऊया?’ ती माझे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच बोलून गेली.””हे तुम्ही दरवेळी म्हणता.”” मी म्हटले, “नाही, या वेळी नक्की जायचे आहे मी ऑफिसचे काम लवकर आटोपून यायचा प्रयत्न करतो. फक्त काही अचानक काम निघू नये म्हणजे देव पावला.’ असे बोलून मी प्रातःर्विधीसाठी निघून गेलो.
जवळपास एक तासानंतर माझे सर्व आटोपून झाले आणि बायकोचे पण सर्व आवरून झाले होते. थोडासा, चहा घेऊन, डबा बॅगेत भरून मी बायकोचा निरोप घेतला आणि ऑफिसकडे निघालो. बायकोने म्हटल्याप्रमाणे रस्त्यावर गर्दी वाढली होतीच. माझे लक्ष सारखे सारखे माझ्या घड्याळाकडे जात होते. कारण, आज मला लवकरात लवकर सर्व कामे आटोपून बायकोला बाहेर घेऊन जायचे होते. त्यामुळे जेवढ्या लवकर मला ऑफिसला जाता येईल तेवढ्या लवकर जाण्यासाठी मी उतावीळ होतो. कदाचित अनेक दिवसांनंतर पहिल्यांदा मी ऑफिसला लवकर जाण्यास इच्छुक होतो. कारण, सहसा कोणताही कर्मचारी ऑफिसला जाताना जेवढा उतावीळ नसतो तेवढा तो ऑफिसमधून बाहेर पडण्यासाठी असतो.
एका सिग्नलवर माझी गाडी थांबली असता माझे लक्ष बाजूच्या फूटपाथवर संसार थाटलेल्या एका जोडप्याकडे गेले. त्यात तो पुरुष आपल्या बायकोची वेणी बांधत होता आणि पिंपळाच्या एका पानाला तिच्या डोक्यात माळत होता. दोघांच्याही अंगावर मस्त कोवळे ऊन पडले होते. कदाचित दोघात काहीतरी प्रेमळ गप्पा चालू असाव्यात कारण, दोघेही मस्त मनमुराद हसत होते. क्षणभर विचार आला, “यांना राहायला घर नाही, खायला दोन वेळचे जेवण मिळेल का नाही, याची शाश्वती नाही. अंगभर कपडेदेखील नाहीत; परंतु यांना प्रत्येक क्षण जगताना आनंद घ्यावसा वाटतो हे खरेच शिकण्यासारखे आहे.’ अचानक हॉर्न वाजू लागले आणि सिग्नल सुटल्यामुळे मला पुढे जावे लागले. परंतु काही क्षण मी माझ्या गाडीच्या आरशामधून त्यांना परत एकदा पहिले त्यावेळी तो नवरा तिच्या डोक्यावर एक टपली मारून हसत हसत उठला. माझ्यासाठी त्या दोघांचा हसरा चेहरा काहीतरी सांगत आहे असे जाणवत होते. परंतु मला ऑफिसला पोहचण्याचे वेध लागल्याने माझे विचार क्षणात लोप पावले.
असो कसाबसा वेळ वाचवत आणि गर्दीतून वाट काढून मी माझ्या ऑफिसमध्ये पोहोचलो. ऑफिसमध्ये पोहोचताच, जसे भुकेले प्राणी आपल्या शिकारवर तुटून पडतात तसा मी माझ्या कामावर तुटून पडण्यास तयार होतो. कारण, अनेक दिवसांपासून बायकोसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग निष्फळ ठरत होते. परंतु आज मी सकाळी बायकोला दरवेळी सारखे प्रॉमिस केले खरे; परंतु येताना सिग्नलवर जोडप्याला पाहिल्याने मला विशेष प्रेम तयार झाले आणि आज कोणत्याही परिस्थितीत तिला बाहेर फिरायला घेऊन जायचेच आणि सिनेमा दाखवायचाच, असा निर्धारच जणू माझ्या मनानी केला आणि सर्व अवयवांना जलद कामे करण्याचे जणू आदेशच देऊन टाकले.
कामाचा काही कालावधी संपला होता, लंच टाइम झाला, मी (आणि कदाचित इतरांनी देखील) बायकोनी बनवलेला डबा आवडीने संपवला आणि परत सर्वजणांनी कामाला सुरुवात केली. थोडा वेळ होताच शिपायामार्फत एक निरोप आला की, सर्वांना सरांनी मीटिंग हॉलमध्ये एकत्रित जमायला सांगितलेले आहे. “मीटिंग हॉल’ हा शब्द ऐकताच एका क्षणात माझ्या मनात काहूर माजले, “”काय निरोप असेल? सर्वांना एकत्रित का बोलावले असेल? काही अचानक काम वाढवले तर नाही ना? आज उशिरापर्यंत थांबण्यास तर सांगितले जाणार नाही ना? आपले काही काम पेंडिंग तर नाही ना? असे विविध प्रश्न माझ्या मनात गर्दी करू लागले आणि परत एकदा बायकोला लावलेली आशा ही आशाच राहून जाईल का, अशी धाकधूक लागून राहिली होती. सर्वजण मीटिंग हॉलमध्ये एकत्र जमा झालो, अनेकांची आपापसात चर्चा चालू होती; पण माझे मन एकाग्र होण्याचे प्रयत्न करत होते.
काही वेळेनंतर सरांनी (मॅनेजिंग डायरेक्टर) मीटिंग हॉलमध्ये प्रवेश केला. सर्वांनी त्यांना उभे राहून आदर दिला, त्यांनी देखील सर्वांना “बसा बसा’ असे सांगितले. परंतु या सांगण्यात एक आनंद जाणवला आणि एक क्षण माझ्या मनातील प्रश्नांची थोडी गर्दी कमी झाल्याचे मला जाणवले आणि मी एक दीर्घ श्वास भरला. सर्वांच्या नजरा सरांच्या बोलण्याकडे होत्या, सर्वांना एकत्र का बोलावले आहे हे सांगण्यासाठी सरांनी बोलण्यास सुरुवात केली. “आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज आपले ऑफिस दोन तास लवकर बंद केले जाईल आणि आपल्या सर्वांना लवकर घरी जाण्यास दिले जाईल.’ सरांचे बोलणे चालूच होते परंतु एवढे ऐकून मी क्षणभर डोळे बंद करून जगातील सर्व देवतांचे जणू आभारच मानत होतो.
आम्ही सर्वांनी आमच्याकडून मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सरांनी त्या स्वीकार पण केल्या. त्यावर सरांनी अजून एक निरोप दिला की, “तिच्या (मॅडमच्या) वाढदिवसानिमित्त (एका पंचतारांकित हॉटेलचे नाव घेतले आणि म्हणाले) हॉटेल एका दिवसासाठी बुक करायचे आहे, सर्व पाहुणे मंडळी आणि मित्र मंडळींच्या स्वागताची तयारी पण करायची आहे, त्यामुळे सर्वांना लवकर सुट्टी (असे म्हणून ते हसले). कारण, पहिल्यांदाच आमच्याकडे तिचा वाढदिवस साजरा होत आहे (पहिल्यांदाच आहे कारण सरांचे लग्न नुकतेच आठ-नऊ महिन्यांपूर्वी झाले होते म्हणून ते असे म्हणाले होते) त्यामुळे घरगुती सेलेब्रेशन करायचे आहे… असो इन्जॉय करा…’ असे म्हणून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. पण काही असो मी मनातल्या मनात मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या. कारण, मला आज वेळेत घरी जायचे होतेच आणि त्याच वेळी त्यांच्यामुळे ही बातमी येणे म्हणजे माझ्यासाठी “सोने पे सुहागा’ असेच झाले होते.
मी काम आटोपून सर्वांबरोबर एकत्र ऑफिस बाहेर पडलो. मी गाडीवरून जाताना मस्त मूडमध्ये गुणगुणत होतो. मला माहीत नाही का? परंतु मी माझ्या लग्नानंतर दोन-तीन वेळेस एकत्र बाहेर गेलो होतो खरे पण, यावेळेस का कोणास ठाऊक मला वेगळा आनंद येत होता, जसे आम्ही पहिल्यांदाच बाहेर जात आहोत. घरी जाताना मस्त एक मोगऱ्याचा गजरा सोबत घेतला आणि कोठेही न थांबता थेट घर गाठलं.
घरी पोहोचताच दारावरची बेल वाजवली, बायकोने दार उघडले आणि क्षणभर मला लवकर आलेले पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिच्या काही बोलण्याअगोदरच मी सरप्राइज असे म्हणत घरात प्रवेश केला. तिने काही सेकंद माझ्याकडे पाहिले आणि मला विचारले, “अरे वा! आज स्वारी खरंच फिरायला घेऊन जायला आली?’ मी पायातील शूज आणि मोजे काढत म्हटलं, “हो, एकदा मी ठरवलं ते ठरवलं. येणार म्हटलं होतं, मी आलो. मग आता पुढे काय ठरवले आहे? कोठे जायचे?’ ती म्हणाली, “मी काही नाही ठरवले. मला वाटलं आज देखील तुम्हाला उशीर होईल!’ मी म्हटलं, “उशीर कसा होणार? आणि मला कोण अडवतंय? मी काहीही करून येणारच होतो… बरं ते जाऊ दे हे बघ काय आणलंय मी!’ असं म्हणत मी बागेतून गजरा काढून तिच्या समोर धरला. गजरा पाहून तिच्या चेहऱ्यावर एक निराळे हसू मला दिसले आणि ती थोडी लाजतच म्हटली, “तुम्ही तर आज नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखं करत आहात.’ “मी म्हटलं, “नवीन?’ मग आपण काय जुने झालो आहोत काय? लग्नाला फक्त दोन वर्षे झाली म्हणजे जुने नाही होत… आणि खरं तर जोडपं कधीच जुनं होत नसत… जुने होतात ते त्यांच्या आठवणी… जोडपं आणि त्यांचं प्रेम वर्षानुवर्षे नवीनच राहतात.’ असे बोलताच ती म्हणाली, “ओ मजनू साहेब आपण आता कुठे जायचे ते सांगा!’ मी म्हटलं “तू फ्रेश हो, मी पण फ्रेश होतो. मस्त गार्डनमध्ये थोडा वेळ जाऊ, तिथून थिएटरला जाऊ, मुव्ही पाहू, रात्री बाहेरच जेवण करू, थोड्या गप्पा मारू आणि परत आपल्या या महालात परत येऊ… कसा वाटला प्लॅन?’ ती मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास घेऊन फ्रीजमध्ये ठेवत म्हणाली, “काही हरकत नाही जाऊया’ (खरे तर ती कधीच माझे निर्णय नाकारत नाही म्हणून माझा कोणताही प्लॅन असता तरी सहज ती मला सहमत होते). मग आम्ही फ्रेश होऊन बागेत फिरून, मुव्ही पाहून बाहेर एका छोट्याशा; परंतु चांगल्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. तिला त्यावेळी आइस्क्रिम खावासे वाटले म्हणून आम्ही थोड्या जवळच असलेल्या आइस्क्रिम शॉपवर जाऊन आइस्क्रिम खाल्ले आणि जवळपास रात्री 11च्या दम्यान घरी परतलो. पुन्हा फ्रेश होऊन आम्ही आराम करायला बेडवर पडलो. काही वेळ त्या काही तासांत घडलेल्या घटनांवर आणि मुव्हीमधील काही सीन्सवर गपशप केली आणि शांतपणे मी वरती फॅनकडे बघत आजच्या दिवसभराची हायलाइटच जणू मी डोळ्यासमोर पाहात होतो.
यात मला एक गोष्ट जाणवत होती की, आज मी तीन वेगवेगळ्या जोडप्यांना अनुभवलं होतं. खरंच या समाजात तीन प्रमुख गट किंवा वर्ग राहतात एक म्हणजे गरीब जो आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी फक्त प्रेमाने तिचे केस विंचरून देत होता, एका झाडाचे पान केसात माळत होता आणि मजेदार किस्से सांगून तिला खूश करत होता. दुसरा म्हणजे माझे बॉस, ज्यांनी आपल्या पत्नीला तिच्या वाढदिवसानिमित्त खूश ठेवण्यासाठी एका आलिशान महागड्या हॉटेलमध्ये सर्व मित्रमंडळींसोबत पार्टी आयोजित केली होती आणि तिसरा म्हणजे मी, जो आपल्या पत्नीला खूश ठेवण्यासाठी तिला एक गजरा देतो, बागेत फिरवून आणतो, मुव्ही दाखवतो आणि बाहेर मध्यम हॉटेलमध्ये जेवण करतो; परंतु या सर्व जोडप्याने आपापल्या परीने आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शक्य असलेल्या गोष्टी करून आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केले. त्यांच्या पत्नीदेखील त्यातच आपले आनंद शोधून त्यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप देत होत्या.
खरंच मला पहिल्यांदा अशा काही घटनांची एकत्र तुलना करावीशी वाटली आणि ती कदाचितच कोणी यापूर्वी केलीही असेल. कारण, या समाजात तीन विभिन्न गटाचे लोक राहात जरी असले तरी त्यांच्यासाठी आपल्या जोडीदाराचे सुख हा एकमेव उद्देश कॉमन असतो आणि ते त्यांच्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतात. अनेकजण यशस्वी देखील होतात. कारण ज्या जोडीदारासोबत आपले संपूर्ण आयुष्य आपण जगणार असतो त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आपण वचन दिलेले असते आणि त्याला आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो यातच खरे प्रेम दडलेले आहे. या सर्व घटनांना पाहून एकच म्हणावेसे वाटते की, या समाजात प्रेम व्यक्त करण्याचे प्रकार अनेक असू शकतात; परंतु मुख्यत्वे प्रेमाचे तीनच वर्ग आहेत, जे मी आज पाहिले आहे.