पुणे – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सेनानी संबोधले जाते. त्याच पार्श्वभूमीवर करोना संसर्गाच्या लढाईत जीवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी लढा देत आहेत. या लढाईत मृत्यू झालेल्यांना शहिद घोषित करण्यात यावे, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड. रवि लाढाणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ई-मेलवर निवेदन पाठवून केली आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शहिदांच्या कुटुंबाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, असेही त्यात म्हटले आहे.
सध्या करोना संसर्गाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. देशात दोन लाखाहून अधिक व्यक्तींना याचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेमध्ये येणारे पोलीस, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी घरात न थांबता, आपले कर्तव्य बजावत आहेत. या सेवेतील काही व्यक्तींनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी अनेकजण त्यावर मात करून बरे झाले आहेत. तर, काहींचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित कारवाई करावी. मृत्यू झालेल्यांचा गौरव करावा, असे निवेदनात म्हटले असल्याचे ऍड. रवि लाढाणे यांनी सांगितले.