पुणे : करोनामुळे संशोधन थांबलेल्या पीएचडीच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रभावाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राज्यातील विद्यापीठे व संशोधन संस्था या कोविड 19 मुळे 24 मार्च पासून बंद आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मागे पडले आहे किंवा रखडले आहे. या कालावधीत काही विद्यार्थ्यांची संशोधन कालखंडाची मुदत संपली आहे किंवा संपत आहे. करोनामुळे जे महिने वाया गेले आहे किंवा अजून जातील, याचा विचार व्हायला हवा. राज्यातील पीएचडी व इतर अधिकचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा करोनामुळे खंडीत झालेला कालावधी त्यांना अधिकचा कालावधी आहे. त्यापेक्षा मान्यतेच्या अधिन राहून मुदतवाढ द्यावीअशी मागणी त्यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांनी फोनव्दारे व प्रत्यक्षात भेटुन मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी राज्यपालांना पत्र पाठवून संशोधन विद्यार्थ्यांना मुदतवाढ वाढविणे आवश्यक आहे याकडे लक्ष वेधले.