बारामती – “पुण्याच्या लॉकडाऊनसंदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नाही, तर व्यापक लोकहित लक्षात घेऊनच व प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच घेतला आहे,’ असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या लॉकडाऊनसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली आहे. त्यावर पवार म्हणाले, “लॉकडाऊनचा निर्णय घेताना शहराची सध्याची परिस्थिती, करोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या, लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन न करणे, प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या. त्याचा व्यापक विचार केला आहे. हा निर्णय करोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे. त्यामुळे त्यात एकतर्फी असायचे काही कारण नाही.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनाही याची कल्पना होती. फोनवरून जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले, त्यांनाही याची कल्पना दिली होती. त्यात पुण्याच्या महापौरांनाही याची माहिती दिली होती. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.’