पुणे -बालभारती पौडफाटा रस्त्यावरून महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष आणि पर्यावरण प्रेमी एकमेकांसमोर उभे ठाकले असून यावरून वाद विवाद सुरू झाले आहेत. या रस्त्याच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून प्रशासनाकडून या कामाच्या निविदांसाठी अटी आणि शर्थी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, हे काम संपण्यास दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने त्यानंतरच निविदा काढली जाणार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी कुलकर्णी यांनी सांगितले.
सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विधी महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या टेकडीवरून सुमारे 250 कोटी रुपयांचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यामुळे या टेकडीवरील जैवविविधता नष्ट होणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध केला आहे. त्यावरून आंदोलनेही होत असून या प्रकरणी नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत आपली भूमिकाही मांडली आहे. तर पाटील यांनीही सर्वांना विश्वासात घेऊनच काम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याचे कोणतेही काम थांबविण्यात आलेले नसल्याचे पथ विभागाने स्पष्ट केल्याने या प्रकरणातील वाद वाढला आहे.
कोथरूडमधील वाहतूक सक्षम करा…
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने या प्रकल्पास विरोध करीत हा प्रकल्प करण्यापेक्षा सार्वजनिक सेनापती बापट रस्ता ते कोथरूड यामार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा, अशी मागणी केली आहे. मनसे जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, सरचिटणीस अनिल राणे, उपाध्यक्ष विशाल शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. या रस्त्याचा खर्च कोथरूडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी करण्याची मागणी केली आहे.
रस्ता प्रकल्पास पाठिंबा… : निकम
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी सभागृहनेते नीलेश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन बालभारती पौड फाटा प्रकल्पास पाठिंबा दिला. या रस्त्यामुळे 30 ते 35 मिनिटांचा प्रवास अवघ्या तीन मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे इंधन, पैसे याची बचत होईल. विधी महाविद्यालय रस्त्यावरील 20 गल्ल्यांमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. त्यामुळे हा रस्ता करावा, अशी आग्रही भूमिका नीलेश निकम यांनी घेतली आहे. तर, या रस्त्यास सध्याविरोध करत असलेल्या अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी हा रस्ता व्हावा म्हणून एकेकाळी आंदोलन तसेच मागण्या करीत होते त्यांचा या रस्त्याला पाठींबा होता. मात्र, आता अचानक विरोध का? असा सवालही निकम यांनी उपस्थित केला आहे.