नेवासे (प्रतिनिधी) – दुचाकीवरून पडला, असे सांगत तालुक्यातील पाचुंदे येथील एका जखमी व्यक्तीस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 6) दाखल केले होते. मात्र प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला पुणे येथील रुग्णालयात हलविले होते. मात्र सहा दिवस मृत्यूशी झुंज देत शनिवारी (दि. 11) अखेर या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र या व्यक्तीच्या नातेवाईकांनी या व्यक्तीचा अपघात झाला नसून, त्याचा खून झाला आहे, असा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रामदास लक्ष्मण खरात (वय 32, रा. खरातवस्ती, ता. पाचुंदे, ता. नेवासे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खरात हे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, भावजय यांच्या समवेत राहत होते. सोमवारी (दि. 6) रात्री रामदास खरात हे दुचाकीवरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगून त्यांच्या वडील व भावाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयाकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुकाणे पोलीस चौकीतील पोलीस हेडकॉन्स्टेबल भीमराज पवार, अंबादास गिते, किशोर काळे यांनी हे जिल्हा रुग्णालयात जखमीचा जबाब घेण्यासाठी गेले. मात्र खरात यांची प्रकृती चिंताजन असल्याने ते जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी (दि. 9) खरात यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र शनिवारी (दि. 11) सकाळी उपचारादरम्यान खरात यांचा मृत्यू झाला. मयत खरात यांच्या सासूरवाडीकडील नातेवाईकांनी हा अपघाती नसून, घरातील व्यक्तींनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. मयत रामदास खरात यांना कर्ज काढायचे होते. त्यामुळे ते भाऊ व वडिलांकडे जमिनीच्या कागदपत्रांवर सही करण्याची मागणी करत होते. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यास मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या भावाने व वडिलांनीच खरात यांचा खून केला, असा आरोप खरात यांच्या सासूरवाडीकडील नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा भाऊ व वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर खरातवस्ती येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तेथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.