खालापूर – खोपोलीतून बारमाही वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिळफाटा आणि सावरोली नदी पात्रात रविवारी (दि.29) सकाळी मेलेल्या माशांचा खच पडल्याची माहिती सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली. दरम्यान औद्योगिक आणि रासायनिक सांडपाणी नदीत सोडल्यामुळेच माशांचा मृत्यु झाला; तर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची चिंता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
खोपोलीसह खालापूर तालुक्यातील कारखान्यातील रासायनिक सांडपाणी तसेच फूड मॉल्स, हॉटेल्स व खोपोली शहरातील मलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्यामूळेच पातळगंगा नदीच्या प्रदूषणाने मर्यादा ओलांडली आहे. परिणामी रविवारी (दि.29) शिळफाटा डिपी रस्त्यावरील विसर्जन घाट आणि सावरोली पुलाखाली शेकडोंच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. रविवारी टाटाने पाणी सोडले नसल्यामुळेच मासे पकडण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. तर दुपारनंतर उन्हामुळे मासे सुकून मृत्यु झाल्याचे भयानक चित्र पहावयास मिळाले.
रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी, फूड मॉल्स, हॉटेल्स आणि खोपोली शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता राजरोसपणे नदीमध्ये सोडले जाते. सांडपाणी सोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. आम्ही पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट वतीने पाताळगंगा नदी संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून नदी प्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरुण गोविंद जाधव यांनी दिला आहे.
प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांकडून पाहणी
नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. याचे गांभिर्य लक्षात घेत, तहसीलदार आयुब तांबोली यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी बोलवले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड विभाग क्षेत्र अधिकारी उत्तम माने, योगेश गोरे यांनी तत्काळ नदी पात्राची पाहणी करीत, मृत मासे आणि नदीतील पाणी तपासणीसाठी घेतले आहे.
पाताळगंगा नदीत मृत मासे सापडल्याची माहिती मिळताच नदी पात्राची पाहणी केली असता सावरोली पुलाखाली मृत मासे निदर्शनास आले आहे. मात्र कशामुळे माशांचा मृत्यु झाला आहे, याची तपासणी केली असता कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही. पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेतले असून लवकरच अहवाल समोर येईल.
– योगेश गोरे, विभाग क्षेत्र अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड