गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांचा ओढा शेअरबाजाराकडे
मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढू लागली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात डि-मॅट खाती काढल्याची माहिती बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी दिली.
उद्योजकांची संघटना असलेल्या फिक्कीने आयोजित केलेल्या भांडवल बाजारावरील परिसंवादात बोलताना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये सामान्य नागरिकांनी शेअरबाजारात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे. बऱ्याच लोकांनी डि-मॅट खाती काढली. त्याबरोबर अगोदर डि-मॅट खाते काढून ठेवलेल्या लोकांनी व्यवहार करायला सुरुवात केली. ही भांडवली बाजाराच्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब आहे.
याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिकांना गुंतवणुकीची दुसरी साधने उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक शेअरबाजाराकडे वळू लागले आहेत.
रोखे डि-मॅट असावेत
सर्वसामान्य लोकांनी शेअरबाजारात प्रथम प्रवेश केल्यानंतर त्यांना गुंतवणुकीची साधी साधने उपलब्ध होण्याची गरज आहे. यासाठी सरकारी रोखे म्हणजे जी-सेक् चांगले साधन आहे. मात्र, सरकारी रोखे डि-मॅट स्वरूपात उपलब्ध होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, आता परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येत आहे. या तीन महिन्यांच्या काळामध्ये भांडवल बाजारातून कंपन्यांनी दोन लाख कोटी रुपयांचे भांडवल केले आहे.सध्याच्या परिस्थितीमध्ये कंपन्यांना भांडवल उभारणे अवघड झाले आहे. त्यामुळे सेबी आपल्या बऱ्याच नियमांमध्ये सुधारणा करीत आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता स्थगित करण्यात आली आहे. त्याचाही परिणाम काही प्रमाणात झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
शेअरबाजार निर्देशांकांत वाढ
गुरुवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर बरीच खरेदी झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक वाढले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 268 अंकांनी म्हणजे 0.71 टक्क्यांनी वाढून 38,140 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी वाढून 11,215 अंकांवर बंद झाला.