जयपूर – देशात करोना संसर्गामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम आणि विवाह समारंभांसाठी देखील कडक नियम आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडवले जातात. त्यामुळे प्रशासन कारवाई करत आहे. मात्र राजस्थानमधील एका नवरीच्या पित्याला प्रशासनाने ठोठावला दंड जीवघेणा ठरला आहे.
बुंदी जिल्ह्यात करोना काळातील लग्नाला प्रशासनाने ठोठावलेल्या दंडाच्या धसक्याने वधुच्या पित्याच निधन झालं. करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका शेतकऱ्यांवर प्रशासनाने दंड ठोठावला होता. हा दंड भरण्यासाठी शेतकऱ्याने जमीन गहाण ठेवले होती. शेतकऱ्याने दंडही भरला, मात्र तीन दिवसांत शेतकऱ्याचं निधन झालं.
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील कापरेन नगरपालिके अंतर्गत येत असलेल्या अडीला गावात मुलीच्या लग्नात करोना नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने वधुच्या पित्याला एक लाखाचा दंड ठोठावला होता. त्यानंतर बृजमोहन मीणा यांनी प्रशासनाच्या दबावमुळे दंडाची रक्कम १७ मे रोजी जमा केली. मात्र २० मे रोजी त्यांचं निधन झालं.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मृत बृजमोहन यांच्या पत्नीने म्हटलं की, १४ मे २०२१ रोजी माझ्या लहान मुलीचं लग्न करोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होत होतं. लग्नात कुटुंबातील ७ लोक जेवण करत होते. तेव्हा काही अधिकारी आमच्या घरी पोहचले. तेव्हा त्यांच्या येण्याने गावकरीही जमले. या गर्दीचा व्हिडीओ बनवून अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
माझ्या पतीची तब्येत आधीच खराब होती. त्यात या प्रकारामुळे तब्येत आणखी बिघडली. प्रशासनाकडून दंड भरण्यासाठी दबाव येत होता. अशावेळी जमीन गहाण ठेऊन आम्ही दंडाची रक्कम भरली होती. या परिस्थितीत आम्हाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बृजमोहन यांच्या पत्नीने केली आहे.