तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. जून महिन्यात गावी परतलेले मेंढपाळांचे कळप ऑक्टोबर महिन्यात पुन्हा जीव धोक्यात घालून महामार्गावरून मावळात दाखल झाले आहेत.
दरवर्षी मावळ तालुक्यात मेंढपाळांचे शेकडो कळप दाखल होत असतात. यंदा तालुक्यात अधिक पाऊस पडत असल्याने मेंढपाळ त्यांच्या मेंढ्या, घोडे, कुत्रे, कोंबडे, गायीसह त्यांचे संसारोपयोगी साहित्य घेवून कुटुंबीय वडगाव हद्दीतून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून मजलदरमजल करीत जीव धोक्यात घालून प्रवास करत मावळात दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती, जेजुरी व दौंड परिसरातील शेकडो मेंढपाळांचे कळप मावळ तालुक्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दाखल होतात. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने जूनच्या सुरुवातीला मावळातून स्वगृही परततात.
प्रथम मेंढपाळांचा संसारोपयोगी साहित्य, मेंढ्यांची पिल्ले, कोंबड्या, कुत्री आदी घोड्यांवर लादून गायी, घोड्यांची शिंगरे व मेंढपाळ महिला व पुरुषांचा ताफा मजल दरमजल करीत प्रवास करतात. मध्येच पावसाने झोडपल्याने त्यांच्या मेंढ्या आजारी पडतात, तर प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो.
मेंढपाळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून मेंढ्या रस्त्यालगतचे गवत खात जीव धोक्यात घालून पुन्हा मावळात प्रवास करतात. बऱ्याचदा महामार्गावरील वाहने मेंढपाळ व मेंढ्यांना चिरडून निघून जातात. त्या मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होते आहे. मेंढपाळांनी नुकसान भरपाई मागितल्यास प्रसंगी वादातून मेंढपाळांना मारहाणीचे प्रसंग यापूर्वी घडले आहेत.