भुलेश्वर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर भुलेश्वर घाटात रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे भुलेश्वर घाट रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पूर्व भागातील नागरीकांमधून होत आहे.
पावसाळ्यानंतर दरवर्षी भुलेश्वर घाटात झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
भुलेश्वर घाटाच्यावर असणाऱ्या माळशिरस, टेकवडी, पोंढे यांना यवत येथे ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तर घाटाच्या वरील बाजूला असणारे भुलेश्वर मंदीर पाहण्यासाठी शिल्प कला अभ्यासक, पर्यटक व भाविक या ठिकाणी सतत येत असतात. या घाट रस्त्यावर असलेली काटेरी झुडपांमुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या परीसरातील झाडे झुडुपे काढून टाकण्याची मागणी भाविक, प्रवाशांमधून होत आहे.