नगर – यंदा आकाशात पतंग दिसण्याचा मोसम उशिराने सुरू झाला. एरवी सप्टेंबर महिन्यातच आकाशात पतंग दिसायला सुरुवात व्हायची आणि संक्रांतीपर्यंत अबालवृद्धांचा उत्साह शिगेला पोहचायचा. मात्र आजकाल थोडीशी समज असलेल्या मुलांच्या हातात मोबाइल आल्याने पतंगाची जागाही मोबाइलने घेतली असल्याने आकाशात तुरळक पतंग दिसू लागले आहेत. त्यामुळे पतंगांच्या माध्यमातून होणारी उलाढाल निम्म्यावर आल्याचे पतंग विक्रेत्यांचे मत आहे.
नगर शहरात पतंगाच्या व्यवसायात एकेकाळी चढा-ओढ असायची. हीच चढा-ओढ पतंग उडविणाऱ्यांमध्येही दिसायची. त्यामुळे बागडपट्टीचे रस्ते पतंगाच्या दुकानांनी गजबजून जायचे. लाखो रुपयांची उलाढाल व्हायची मात्र मुलांच्या हातात मोबाइल आले अन पतंगवाल्यांच्या व्यवसाय निम्म्यावर आला.
आता हौशी लोकच पतंग उडविताना दिसतात. त्यातही आधीसारखी चढा-ओढ नसते. सुरुवातीच्या काळात पतंग उडवितांना एखादा पतंग कटला की व्हय काप्प्या… अशी हाळी ऐकू यायची मात्र आता तशी हाळीही ऐकू येइनाशी झाली आहे नाही म्हणायला संक्रांतीच्या दिवशी शहरातील इमारतींच्या गच्च्यांवर स्पिकर्सचा दणदणाट ऐकायला मिऴतो.
तरुणाई त्यातालावर थिरकते. व्हय काप्प्या… अशा हाळ्या ऐकू येतात मात्र हे सगळं तेवढ्याच दिवसा पुरतं. अशी खंतही या विक्रेत्यांकडून ऐकायला मिळाली.
आजमितीला नगरच्या बाजारात पतंगांची 40 ते 50 दुकाने आहेत. कागदी तावाचे आणि मेटॅलिक पेपरचे त्यातही प्रकार गोंडा, झोपडी, बादशाह,फऱ्या हे पारंपरिक प्रकार, तर फॅन्सीमध्ये विमान, पान,चिमणी गरूड हे प्रकार यंदा नव्याने आले आहेत. त्यांची किंमत 2 एक रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत तर मेटॅलिक पेपरचे पतंग 30 ते 40 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर मांज्यामध्येही बरेली पांडा, 30 नंबरधाग्या पासून बनविलेला मांजा असे प्रकार आहेत. 150 रुपयांपासून ते 350 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
व्यवसायावर परिणाम
एरवी सप्टेंबर महिन्यापासूनच मुलांना पतंगबाजीचे वेध लागायचे, मात्र आजच्या मोबाइलच्या जमान्यात मुले पतंगांकडे फारशी आकर्षित होत नाहीत. आता फार तर नाताऴपासून पतंगबाजीला सुरुवात होते ती संक्रांती पर्यंतच… त्यानंतर मुले पतंगांकडे फिरकतही नाहीत त्यामुळे पतंगाच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे पतंग विक्रेते विवेक लोटले यांनी सांगितले.