नगर – गेल्या महिन्यांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता मेटाकूटीला आहे. जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळी, वादळी पाऊस व गारपिटीमुळे दहा तालुक्यातील 12 हजार 399 हेक्टवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. यामुळे 23 हजार 714 शेतकरी बाधित झाले असून त्यांचे मोठे आर्थिक फटका आहे.
दरम्यान, अकोले, जामखेड, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा तालुका मात्र अवकाळी, गारपिटीतून बचावला आहे. जिल्ह्यात 7 एप्रिलपासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यातील 133 गावातील रब्बी हंगामात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच शेती मालाच्या भावामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
7 ते 9 एप्रिल दरम्यान, जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली. यामुळे शेतात असणाऱ्या गहू, मका, उन्हाळी बाजारी, कांदा, वाटाणा, कलींगड, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिलदरम्यान झालेल्या वादळ, गारपिटीमध्ये 4 मोठी जनावरे आणि 5 लहान जनावरे दगावली. तर 332 ठिकाणी घरांची पडझड झाली.
यात नगर तालुक्यात 28, जामखेड 1, कर्जत 3, नेवासा 81, पारनेर 153, पाथर्डी 7, संगमनेर 18, शेवगाव 30 आणि राहाता 1 घराचा समावेश आहे. यासह 7 तालुक्यात जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. यात नगर 3, नेवासा 2, शेवगाव 2 यांचा समावेश आहे.