उरुळी कांचन- हवेली तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वसंतराव कुंजीर पाटील यांनी आज हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांना निवेदन दिले.
कष्टकरी शेतकऱ्यांचे उभे पीक डोळ्यांसमोर निसर्गाच्या अनपेक्षित कोपाने हातातून गेले. परवा दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, मका, पालक, मेथी, शापू पालेभाज्यांसह, फुलशेती पार कोलमडली आहे. हाती आलेले पीक चांगल्या बाजारभावात जाईल, त्यातून दिवाळी सण गोड होईल, या आशेवर असलेला शेतकरी निसर्गाच्या कोपाने ढसाढसा रडला आहे. ज्या पिकाच्या भरोशावर गोड स्वप्न पाहिले ते पीकच राहिलेले नाही. येणारा दिवाळी सण साजरा होणार कसा? या विवंचनेत बळीराजा अडकून पडला आहे. बुधवार (दि.24) आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, सोरतापवाडी, उरुळी कांचन, नायगावसह इतर गावातील शेतकरी कोलमडला आहे. उभी पिके पावसाने गेल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दोन दिवस उलटूनही शासन दरबारी कुठेही कसलीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.