मुंबई – करोना काळात अनेकांवर बेरोजगारीची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली होती.
या शिथिलतेचा गैरफायदा घेत मुंबईतील कांदिवली येथील पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. हा धक्कादायक प्रकार लेखा परिक्षणातून उघडकीस आला आहे.
देशात मार्च 2020 ते जून 2021 या काळात करोना साथीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. याच काळात कांदिवली पीएफ कार्यालयातील लिपिक चंदन कुमार सिन्हा याने अफरातफर करत कोटयवधीचा घोटाळा केला. या घोटाळ्यात कार्यालयातील आणखी पाच कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे.
या संदर्भात जुलै 2021च्या सुरुवातीला एका निनावी तक्रारीमुळे करण्यात आलेल्या लेखा परिक्षणानंतर ही फसवणूक उघडकीस आली. 817 स्थलांतरित कामगारांच्या बॅंक खात्याचा वापर करून पीएफच्या रकमेचा दावा केला आणि एकूण 21.5 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळवले. या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या घोटाळ्याचा सूत्रधार हा एका स्थानिक रुग्णालयात दाखल झाला आणि नंतर बेपत्ता झाला.
दरम्यान, ईपीएफओने अंतर्गत लेखापरीक्षणाची व्याप्ती वाढवली असून, कार्यालयीन प्रणालीच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बॅंकांना ही 817 बॅंक खाती गोठवण्यासाठी पत्र लिहिले आहे. तसंच आतापर्यंत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मागोवा घेऊन ती वसूल करण्यात आली आहे.