नवी दिल्ली – सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून तसेच त्यांचा छळ केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पण या प्रकरणात शशी थरूर यांच्यावर कोणताही आरोप ठेवण्यास कोर्टाने मनाई करत त्यांना सर्व आरोपातून मुक्त केले आहे.
या निर्णयामुळे आपल्याला मोठाच दिलासा मिळाला असून गेली सात वर्षे आपला या साऱ्या प्रकरणात खूपच छळ झाला होता असेही शशी थरूर यांनी म्हटले आहे.
51 वर्षीय सुनंदा पुष्कर यांनी शशी थरूर यांच्याशी सन 2010 मध्ये अधिकृतपणे विवाह केला होता. त्या 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील एका पंचातारांकित हॉटेलात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यावेळी शशी थरूर हे खासदार होते पण त्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या निवासस्थानाचे नुतनीकरण केले जात असल्याने सुनंदा पुष्कर व शशी थरूर हे दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात वास्तव्याला होते.
त्याच हॉटेलात सुनंदा पुष्कर या एकट्या असताना नंतर त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांची हत्या झाली आहे आणि शशी थरूर यांनीच ती केली आहे असाही आरोप माध्यमांनी केला होता. नंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या कारणावरून हा खटला दाखल केला होता. आता आपल्याला मोठा दिलासा मिळाला असून मी आता आमच्या सर्व कुटुंबियांच्यावतीने सुनंदा पुष्कर यांना सुखाने श्रद्धांजली वाहू शकतो अशी भावनिक प्रतिक्रीया शशी थरूर यांनी दिली आहे.
अशा खटल्यांमध्ये न्यायाची जी प्रक्रिया असते तीही एखाद्या शिक्षेसारखीच असते अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. सुनंदा यांना अनेक प्रकारचे आजार होते व त्यासाठी त्या विविध प्रकारची औषधे घेत असत. त्यांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू होता असे आपले पहिल्यापासूनचे सांगणे होते असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट करण्यास सरकारी पक्षाला अपयश आल्याचे नमूद करीत कोर्टाने त्यांना दोषमुक्त केले.